अक्कलकोट – वाढती लोकसंख्या, हवामान बदलाचे तीव्र परिणाम आणि घटत चाललेली शेतीयोग्य जमीन या पार्श्वभूमीवर कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. वसंत जुगळे यांनी केले.
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागातर्फे आयोजित पीएम उषा अंतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी अर्थशास्त्र परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. जुगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव सुभाष धरणे, प्राचार्य डॉ. जी. एस. धबाले उपस्थित होते.
‘ स्पर्धात्मक आधुनिक शेती पद्धती ‘ या विषयावर बोलताना डॉ. जुगळे पुढे म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्र अनेक आव्हानांना सामोरे गेले आहे. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या परिस्थितीत बळीराजाला विविध माध्यमांतून मदतीचा हात देणे अत्यावश्यक आहे.कमी खर्च, कमी पाण्याचा वापर आणि नैसर्गिक आपत्तींचा प्रभावी सामना करत शाश्वत आर्थिक विकास साध्य करण्यासाठी आधुनिक शेती उपयुक्त ठरते. यामुळे अन्नसुरक्षा बळकट होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होते.स्मार्ट सिंचन तंत्रज्ञानाद्वारे ठिबक आणि तुषार सिंचनाचा अवलंब केल्यास सुमारे ६० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत शक्य आहे. ड्रोन व रोबोटिक्स सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कीटकनाशकांची अचूक फवारणी व पिकांचे आरोग्य परीक्षण करता येते. तसेच कमी रासायनिक किंवा सेंद्रिय खतांचा वापर करून सुधारित, रोगप्रतिकारक व अधिक उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा अवलंब करणे आवश्यक आहे. पारंपरिक पिकांऐवजी फलोत्पादन, औषधी वनस्पती लागवड आणि पॉली हाऊस शेतीकडे वळल्यास उत्पादन वाढीस चालना मिळू शकते. यामुळे मानवी श्रम व उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्या नफ्यात वाढ होते. सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि शाश्वत विकासाचा मार्ग सुकर होतो, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परिषदेत उत्साहात सहभागी होऊन यामधील व्याख्यानाचा श्रवण करुन अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले. प्राचार्य डॉ. धबाले यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले.दुपारच्या सत्रात गव्हर्नमेंट महाविद्यालय कलबुर्गी येथील डॉ. टी. आर. गुरुबसप्पा यांनी ‘बाजार संबंध, किमान आधारभूत किंमत आणि कृषी विपणन सुधारणा’ या विषयावर, डॉ. राजेंद्र पाटील यांनी ‘सेंद्रीय शेती व आधुनिक सिंचन व्यवस्था’ या विषयावर, डॉ. विजय व्हनकडे ( पुणे) यांनी ‘ डिजिटल शेती व स्पर्धात्मक आधुनिक शेती ‘ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.या परिषदेस सोलापूरचे डॉ. राजाराम पाटील, डॉ. सुनील मगर, डॉ. अविनाश जम्मा, डॉ. महादेव कांबळे, डॉ. रेवप्पा कोळी, डॉ. शंकर राजे, प्रा. युवराज सोलापूरे, डॉ. राहुल भोसले डॉ. राहुल मोपारे ( कोल्हापूर) यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. किशोर थोरे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संध्या इंगळे यांनी केले.
कोल्हापूर च्या फडके प्रकाशन तर्फे अर्थशास्त्र विषयावरील पुस्तक व संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आला होता. या प्रदर्शनाला सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी भेट देऊन पुस्तक व संदर्भ ग्रंथांची खरेदी केली.
विद्यार्थ्यांना भविष्यात शेती, शेतीपूरक व्यवसायात सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी दशेतच अत्याधुनिक शेतीचे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी शेती आणि पूरक व्यवसायातून भविष्य घडवावे.
– बसलिंगप्पा खेडगी
चेअरमन
अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी.

























