नोएडातील सेक्टर ११५ मधील एका मिठाई बनवणाऱ्या युनिटवर दिल्लीच्या अन्न सुरक्षा विभागाने हल्लीच छापा टाकून ११०० किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करून ती जागेवरच नष्ट केली. याच विभागाने जीबी नगर परिसरात आणखी एका ठिकाणी छापा टाकून १८० किलो भेसळयुक्त मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ जप्त केले. जयपूरच्या अन्न सुरक्षा विभागानेही अशाच एका कारवाईत ३५० किलो भेसळयुक्त मिठाई. ६५० किलो बनावट मिल्क केक आणि ५०० लिटर नकली दूध जप्त करून ते नष्ट केले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील अन्न आणि औषध प्रशासनाने “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा” मोहिमेच्या अंतर्गत ३६ लाख रुपयांचा तब्बल ३० हजार किलो निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त केला. दूध, मिठाई, तूप, पनीर, फरसाण यांसारख्या पदार्थांचे नमुने तपासले असता अनेक ठिकाणी भेसळ आढळली. दिवाळी जवळ आली कि मिठाईत भेसळ करून ती चढ्या दारात विकणाऱ्यांचे सर्वत्र पेव फुटते. या काळात सर्वत्र गोडधोडाचे वातावरण असल्याने घसा खवखवणे, खोकला सुरु होणे यांसारखे त्रास जाणवू लागले तरी ते मिठाईमुळे होत आहेत कि घरात बनवलेल्या तेलकट फराळामुळे ते कळत नाही. या दिवसांत प्रशासनाचा अन्न आणि औषध विभाग अलर्ट मोडवर असतो. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्याच्या लोभाने ही भेसळयुक्त मिठाई बनवली जाते. भेसळयुक्त पेढे किंवा मिठाई खाल्यास घशात खवखव होते, खोकला येतो आणि पोटात दुखते. चक्कर येणे, पोटात मळमळणे , उलटी, जुलाब सुरु होणे यांसारखे परिणाम जाणवू लागतात. काविळसारख्या आजाराची लागण होऊ शकते. किडनी आणि यकृतावरही भेसळयुक्त मिठाईचा गंभीर परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही, तर विषबाधा अधिक झाल्यास खाणाऱ्याचा मृत्यूही ओढावू शकतो. भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो. कृत्रिम दुधात युरियाची भेसळ असल्यास युरियातील नायट्रोजनमुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदय निकामी होऊ शकते. मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे दूध केमिकलयुक्त असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत निष्पन्न झाल्यास भारतीय दंड विधान ३२८ कलमान्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो. मिठाईसाठी वापरण्यात आलेल्या दुधात पाणी आणि दुधाची पावडर मिश्र केल्याचे आढळल्यास २६२ कलमान्वये गुन्हेगारास आर्थिक दंड ठोठावण्यात येतो. असे असूनही प्रतिवर्षी मिठाईत केल्या जाणाऱ्या भेसळीचे प्रमाण कमी न होता दरवर्षी त्यांमध्ये वाढच होत आहे. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात अनेक ठिकाणी भेसळयुक्त मिठाई सर्रासपणे विकली जाते. आर्थिक लाभासाठी पामतेलाचा वापर करून खवा बनवणे. कृत्रिम आणि केमिकलयुक्त दूध तयार करून त्यापासून मिठाई बनवणे यासारखे प्रकार सणासुदीच्या काळात प्रकर्षाने घडतात. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा महाभागांना खरेतर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे; मात्र अनेकदा ही मंडळी कायद्यातील पळवाटांचा लाभ घेऊन निर्दोष सुटतात किंवा जामिनावर बाहेर पडतात. यांमध्ये कायद्याचे भय न राहिल्याने दरवर्षी भेसळयुक्त मिठाई बनवून विकणाऱ्यांमध्ये वाढच होताना दिसत आहे. यांच्यावर कायमस्वरूपी वचक बसण्यासाठी कठोर कायद्यासह जनमानसांत जागृती होणे नितांत गरजेचे आहे. लोकांच्या जीवाचे सोयरसुतक नसणाऱ्यांना खरेतर आता जनतेनेच धडा शिकवायला हवा !
सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...