सोलापूर – घरची आर्थिक जडणघडण ही माता भगिनींच्या हाती असते, खर्च आणि बचतीमुळे नियोजन आणि निर्णय क्षमता वृद्धिंगत होते. शारीरिक आणि मानसिक कणखरपणा यातून निर्माण होतो. कुटुंबावर आलेली संकटे स्वतःवर घेऊन कुटुंबाला उभारी देण्याचं काम नारीशक्ती करतात, अशा नारीशक्तीमुळे भारत आर्थिक महा सत्तेच्या जवळ आहे असे प्रतिपादन शहर उत्तरचे आ. विजयकुमार देशमुख यांनी केले.
भवानी पेठेतील रेवणसिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय योग संस्थान नवी दिल्ली संचलित बसव योग केंद्रातर्फे नारी शक्ती गौरव पुरस्काराचे वितरण रविवारी सायंकाळी करण्यात आले. पुढे बोलताना आ.देशमुख म्हणाले की, माता भगिनींमध्ये कोणतेही समस्येला सामोरे जाण्याची क्षमता जास्त असते म्हणूनच स्त्रियांना शक्ती स्वरूप म्हटलं जातं. राज्य शासन देखील अनेक योजना आपल्या माता भगिनींसाठी राबवित आहेत. नारीशक्तीचा सन्मान अशा पुरस्काराने करणे म्हणजे स्त्रियांमधील शक्ती रूपाला नमन करणे होईल असेही आ.देशमुख म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक डॉ.किरण देशमुख, उद्योजक लक्ष्मीकांत चाटला,सुभाष जक्कापुरे,दिलीप दुलंगे,उद्योजक वीरेंद्र हिंगमिरे,योगगुरु शेखर लक्ष्मेश्वर, बसव योग केंद्राचे उज्वला शिवगुंडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी जीवन गौरव पुरस्कार रामचंद्र शेषप्पा पुडूर, यांनाअध्यात्मिक सेवा पुरस्कार ब्रम्हकुमारी प्रभावती माता, नागरी सेवा पुरस्कार सौ.रूपा दुस्सा, कै.चन्नप्पा गुळगी उद्योगरत्न पुरस्कार रत्नमाला शेजुळ, देवमाणूस कै.डॉ.मोहन तंबाके वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉ.सौ.सारिका उंबरे, कै.मातोश्री शकुंतला खोबरे प्रेरणा पुरस्कार कविता तांडूरे, चंद्रकला बिराजदार, तर आदर्श महिला सामाजिक संस्था पुरस्कार रुद्रसेना महिला मंडळाला प्रदान करण्यात आला. शाल, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, बसव पदक आणि पैठणी असे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ.सारिका उंबरे, रूपा दुस्सा, समाजभूषण रामचंद्र पुडूर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उज्वला शिवगुंडे यांनी सूत्रसंचालन सागर कौलगी यांनी तर प्रज्ञा ख्याडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास बसव योग केंद्राचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.