भोकरदन : भोकरदन विधानसभा मतदार संघाच्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या साडे सात ते आठ हजार बोगस नावांबाबत जिल्हा काँग्रेसच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे. सदर बोगस नावं तात्काळ वगळली नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी भोकरदन तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भोकरदन विधानसभा मतदार संघातील प्रारूप मतदार यादी नुकतीच प्रकाशित करून त्यावर दि. २० ऑगस्ट पर्यंत आक्षेप, हरकती मागविण्यात आल्या आहेत.
त्या अनुषंगाने जालना जिल्हा काँग्रेस कमिटीकडुन जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली १०३ भोकरदन – जाफराबाद विधानसभा प्रारूप मतदार यादीत बदनापूर विधानसभा मतदारसंघातील जवळपास साडेसात ते आठ हजार नावे समाविष्ट करण्यात आल्याने त्यावर निवडणूक आयोगाच्या नमुना फार्म नं ७ (नियम १३ (2) आणि २६ पुराव्यासह संपुर्ण यादीचे गठ्ठे आज सोमवारी भोकरदन तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकारी सपकाळ यांच्याकडे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले की, या मतदार यादीत अंदाजे २२ हजार ४०० मतदारांची दुबार नावे असून बदनापूर मतदारसंघातील बोगस नावे भोकरदन शहरात अंदाजे साडेसातशे ते आठशे असून शहरात दुबार नावे अंदाजे पंधराशे ते सोळाशे आहेत. ही सर्व बोगस नावे मतदार यादीतून तात्काळ वगळण्यात यावी नसता जालना जिल्हा काँग्रेस कमिटीकडुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देशमुख यांनी यावेळी दिला.यावेळी तालुकाध्यक्ष त्रिंबकराव पाबळे, उपाध्यक्ष इरफान सिद्दीकी, नगरसेवक अन्नदाते, रमेश जाधव, सोशल मीडियाचे सोपान सपकाळ, प्रतीक देशमुख, रामचंद्र गायके, रोषण देशमुख, काकासाहेब ढवळे, संभाजी देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.