राज्यात भाजपाचा निराशाजनक पराभव झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
या पत्रकारपरिषदेत बोलतांना फडणवीस यांनी थेट उपमुख्यमंत्रीपद सोडून भाजप पक्षसंघटनेसाठी पूर्णवेळ काम करण्याची इच्छा बोलून दाखवली.
पुढे बोलतांना ते म्हणाले, भाजपमध्ये सगळे निर्णय पक्ष घेतो पण मी पक्षाला विनंती करतो की, मला आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पूर्णवेळ उतरायचे आहे. त्यासाठी मी शीर्षस्थ नेतृत्त्वाला विनंती करणार आहे, त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं, मला पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी.
जेणेकरुन पक्षसंघटनेत ज्या काही कमतरता राहिल्या आहेत, त्या दूर करण्यासाठी मला वेळ देता येईल. मी सरकारमधून बाहेर राहिलो तरी आम्हाला जे काही करायचं आहे ते आमची टीम करेल. यासंदर्भात मी पक्षाच्या वरिष्ठांना भेटणार आहे आणि त्यांच्या सल्ल्याने पुढच्या गोष्टी करेन, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
दरम्यान, यावर बोलतांना भाजपचे नेते चंद्रकांत बावनकुळे म्हणाले कि, देवेंद्र फडणवीसांना महायुतीचे काम करण्यासाठी सरकारमधून बाहेर पडण्याची आवश्यकता नाही. त्यांनी सरकारमध्ये राहूनच महायुतीचे काम केल्यास येत्या निवडणुकीत फायदा जास्त होईल.