बार्शी – नगरपरिषदेच्या भाजपच्या नूतन नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत मिरवणुकीद्वारे वाजत गाजत जाऊन नगरपालिका मुख्यालयात नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
सकाळी अकरा वाजता कथले यांच्या निवासस्थानापासून शेकडो नागरिक आणि भाजप कार्यकर्ते तसेच नगरसेवकांच्या उपस्थितीत भव्य मिरवणूक काढण्यात आली. लेझीम, ढोल ताशे, संबळ अन हलगी अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात मुख्य मार्गाने ही मिरवणूक पालिकेजवळ आली. शिवसृष्टीमधील शिवरायांचा पुतळा, ग्रामदैवत श्री भगवंतांचे दर्शन घेऊन माजी आमदार राजेंद्र राऊत, कविता राऊत, पती प्रशांत कथले, कुटूंबिय, नातेवाईक आणि नगरसेवक यांच्या उपस्थितीत सन्मानाने तेजस्वी कथले यांनी पदभार स्वीकारला.
त्यानंतर नगरपालिका आवारात छोटेखानी कार्यक्रमात सर्व नगरसेवक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, बाजार समिती सभापती विजय गरड, भाजप शहराध्यक्ष महावीर कदम, तालुकाध्यक्ष मदन दराडे, गडदे, सेनेचे तालुकाप्रमुख विजय माने आदींसह नगरसेवक उपस्थित होते.
मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांनी प्रस्ताविकात सर्वांचे स्वागत करत प्रशासन आणि पदाधिकारी हातात हात घालून शहराचा विकास करु, अशी ग्वाही देत नूतन नगरसेवक आणि नगराध्यक्षा यांना शुभेच्छा दिल्या. उपमुख्याधिकारी विठ्ठल पाटोळे, राजाराम नरुटे, नगर अभियंता आणि सर्व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. नगरपालिका सभागृह,नगराध्यक्ष दालन यांची फुलांनी सजावट करण्यात आली होती.
नूतन नगराध्यक्ष तेजस्विनी कथले म्हणाल्या, मी शहराची प्रथम सेवक आहे. प्रशासन आणि विरोधक यात समन्वय राखत हेवा वाटेल असा कारभार करु. देवभाऊ, जयाभाऊ अन राजाभाऊ हे तीन लाडके भाऊ शहरासाठी निधी कमी पडू देणार नाहीत. पाणी प्रश्न एप्रिलपर्यत मार्गी लावेन. माझे कार्यालय हे सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर राहील. जिल्ह्याला हेवा वाटेल असे स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित शहर बनवू, असे अभिवचन दिले.
माजी आमदार राजाभाऊ राऊत म्हणाले, तालुक्यात विकासाची थांबलेली घोडदौड पुन्हा सुरु होईल. तालुका पाठीमागे गेला अशी लोकांना भीती वाटत होती. काहीजणांनी तालुक्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. राजकारणात काहीही होऊ द्या, कोण येईल कोण जाईल पण आपण ज्या गावात जन्मलो आणि वास्तव्य आहोत अशा आपल्या गावाची बदनामी होईल असे पाप कुणीही करु नका. चार वर्षे प्रशासक कारकीर्द होती. त्यामुळे एकट्या सीईओंना काम करताना अडचणी निर्माण झाल्या. नगरपालिकेत आर्थिक तुटवडा तयार झाला आहे. २५ कोटी अनुदान जुनी देणी देण्यासाठी सरकारकडून मंजूर होईल. निधी आणण्यात आपण एक्स्पर्ट आहोत. शहरवासियांनी काळजी करण्याचे कारण नाही. ३२ नगरसेवक विजयी होतील, अशी अपेक्षा होती. थोड्या जागा कमी आल्या. पराभूत झाला असला तरी तुम्ही नगरसेवक आहेत, लोकांत जावा. त्यांची कामे करा.
विरोधकांना उद्देशून राऊत म्हणाले, तुम्हाला आयुष्यात गुलाल पडू देणार नाही. जरा मोठं मन करा की, आज विरोधी नगरसेवक आले नाहीत. त्यांचा काहीतरी कुटील डाव सुरु होता. जाणीवपूर्वक कटकारस्थान आणि बदनामी आम्ही सहन करणार नाही. आम्हाला काय घेरणार, आमच्या मनात कुणाविषयी काही नाही. प्लॅनिंग करुन अडचण करण्याचा प्रयत्न करु नका, आम्ही सक्षम आहोत.
कोणी आपणास नावं ठेवणार नाही असा कारभार करा. हारतुरे स्वीकारताना आपल्याला ज्यांनी सहकार्य केले त्यांना फक्त विसरु नका. माझी हात जोडून विनंती आहे. कारण जिवाभावाचे सोबती महत्वाचे. सर्वांचा तुम्ही सन्मान करा, लोकांसोबत आपुलकी ठेवा, उज्वल कारकीर्द होईल अशा शुभेच्छा दिल्या.
























