धाराशिव – जिल्ह्यातील सांजा गावाजवळ सुरू असलेल्या सोलापूर–तुळजापूर–उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर ब्लास्टिंग होत असून, त्यामुळे परिसरातील घरांना तडे जाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या प्रकरणी युवासेना तालुका प्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी तातडीने पुढाकार घेत प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर करून प्रश्न लावून धरला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधित विभागाला सांजा गावाजवळील ब्लास्टिंग तात्काळ थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यासोबतच, ज्या घरांचे नुकसान झाले आहे त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कामकाजाची पद्धत बदलण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात विलंब होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
























