मुंबई – मतदार याद्यांवर कार्यकर्त्यांनी जोरात काम करण्याबरोबरच दुबार- तिबार मतदान करणारे दिसलेच तर त्यांना लोकशाही मार्गाने फटकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले.
निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभार व मतचोरी विरोधात सर्वपक्षीयच्यावतीने सत्याचा मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्याचे रूपांतर सभेत झाल्यानंतर ठाकरे बंधुनी निवडणूक आयोग व भाजपावर कडाडून हल्ला केला. तर
निवडणुकीमध्ये होणारी मतचोरी थांबवून लोकशाही आणि मतदानाचा अधिकार टिकवण्यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एक होणे गरजेचे आहे, मत महाविकास आघाडीचे शिल्पकार व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

मोर्चात. शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह सर्वच विरोधी पक्षाचे नेते या मोर्चात सहभागी झाले होते. चर्चगेट-फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिका मुख्यालय असा काढण्यात आलेल्या मोर्चाचे महापालिका मुख्यालयाजवळ विराट सभेत रूपांतर झाले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, डाव्या पक्षांचे नेते प्रकाश रेड्डी, शेकापचे जयंत पाटील आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.
राज ठाकरे यांनी राज्यातील दुबार मतदानाच्या यादीचे गठ्ठे सादर करून म्हणाले, “अशा दुबार – तिबार मतदारांना तिथेच फोडून काढा, बडव, बडव, बडवा आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात द्या. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाहीत. महाराष्ट्रात सुरु असलेला हा कारभार थांबवायचा असेल, तर हेच केले पाहिजे,” उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकाने मतचोर जिकडे दिसेल तिकडे त्याला फटकवा, असा आदेश देतानाच, “आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही. पण, जर कायद्याचा खोटा दंडुका जर तुम्ही आमच्यावर डोक्यावर मारणार असाल तर तर त्याचे काय करायचे? हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्राची जनता सक्षम आहे. आजचा मोर्चा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा आहे, जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ आणि पारदर्शक होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. आधीच पाच वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत अजून एक वर्ष नाही झाल्या तर काही बिघडत नाही, असे सांगत मतदार याद्या स्वच्छ करण्याचे आवाहन त्यांनी आयोगाला केले. मात्र हे करण्याऐवजी सगळे लपून छपून सुरु असल्याचा टोला त्यांनी लगावला.
“मतदार याद्या स्वच्छ आणि पारदर्शक करणे हा फार छोटा विषय आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, आम्ही (मनसे) यावर बोलत आहोत. शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, कम्यूनिस्ट पक्षाचे लोक दुबार मतदारांबद्दल बोलत आहेत. एवढेच कशाला भाजप,शिवसेना ( शिंदे गट ) आणि अजित पवार यांच्या पक्षाचे लोक सुद्धा हेच बोलत आहेत. मग निवडणूक आयोगाला याद्या दुरुस्त करण्यासाठी कोण अडवत आहे?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. “मतदार याद्या साफ करा, पारदर्शक करा आणि मग निवडणुका घ्या. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत यश – अपयश कोणाचे असेल ते नंतर पाहू. मात्र सगळे लपून-छपून कशासाठी चालू आहे, हेच कळत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि मनसे वारंवार मतदार याद्यांमधील घोळ समोर आणत आहे. ‘काढ रे तो कपडा’ म्हणत राज यांनी यावेळी याद्या सादर करीत कल्याण भिवंडीच्या ४,५०० मतदारांनी मलबार हिलमध्ये मतदान केल्याचे पुरावे सादर केले.
पक्षभेद बाजूला ठेवून मतचोरी रोखा – उद्धव ठाकरे
महाराष्ट्राने पक्षभेद बाजूला ठेवून लोकशाहीच्या रक्षणासाठी एकजुटीची मूठ आवळली आहे, त्यामुळे मतचोरी करून निवडणूक घेण्याचा प्रयत्न केलात तर ही मूठ सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. त्यासाठी शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, कम्युनिस्ट आणि शेकापचे कार्यकर्ते करताहेत तसे सर्व मतदारांनी आपापले नाव मतदार यादीत आहे की नाही हे पुन्हा तपासावे, घरात आपल्याला न दिसणारी, आपली परवानगी न घेतलेली माणसे राहतात की नाही हेसुध्दा तपासा, असे आवाहन त्यांनी केले.
‘निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा नोकर आहे, त्यांची सत्तेची भूक थांबत नाही. शिवसेना पक्ष आणि निशाणी चोरली आता वडील चोरत आहेत, ते पुरत नाही म्हणून मतदान चोरी करत आहेत. विरोधी पक्षांनी मतचोरीचे धडधडीत पुरावे दिल्यानंतरही राज्यकर्ते आणि निवडणूक आयोग काहीच करत नाही, असा संताप करून त्यांनी “विरोधी पक्षांनी लोकसभेत कोणत्या मतदारसंघात कसा लाभ घेतला त्याचा पर्दाफाश करेन, या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांनी हा पर्दाफाश करावाच, असे आव्हान दिले. तसेच त्यांचे हे वक्तव्य म्हणजे मतचोरी झाल्याचे त्यांना मान्य आहे, असे सांगून
उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही शरसंधान करताना पुन्हा त्यांचा उल्लेख अनाकोंडा असा केला. आज सर्व नागरिकांना जागे नाही झाले तर अनाकोंडा आ जायेगा, असा फिल्मी डायलॉग उद्धव ठाकरे यांनी यावेळी मारला.

मराठी माणसांसाठी आम्ही एकत्र
आम्ही आम्हाला काही व्हायचे म्हणून एकत्र आलो नाही, तर मराठी हिंदू माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही दोन बंधू एकत्र आलो आहोत. आम्हाला निवडणूक हव्या आहेत. मात्र त्या पारदर्शक अस्वायत अशी आमची मागणी आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आपण एकत्र आलेच पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
———–
ठाकरे कुटुंबाचे नाव मतदारयादीतून हटवण्याचा कट
संपूर्ण ठाकरे कुटुंबाचे नाव मतदारयादीतून हटवण्यासाठी मोठा कट रचला जातोय, असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. त्यांच्या नावाने करण्यात आलेल्या निवडणूक आयोगाकदे मतदार यादीतील नावाच्या पडताळणीचा खोटा अर्ज करण्यात आला होता. सदर अर्जाबाबत अर्जदार यांची भेट घेऊन अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाल्याने सदर अर्ज बाद करण्यात आला आहे, असा तो शेरा होता.आपल्या नावाने कुणी अर्ज केला हे उद्धव ठाकरे याना माहितीच नव्हती.
त्यानंतर मातोश्रीवर निवडणूक आयोगाची माणसे आली होती त्यांनी या अर्जाबद्दल आपल्याला विचारणा केली असता त्यावरचा टेलिफोन नंबरही खोटा होता. २३ ऑक्टोबरला सक्षम नावाच्या अपवरून हा अर्ज केला गेला होता. त्याबाबत आपण रितसर तक्रार केली. याचा अर्थ माझ्या नावाने खोट्या नंबरवरून ओटीपी काढण्याचा प्रयत्न झाला आहे. सिस्टीम हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. माझ्यासकट माझ्या कुटुंबातील चारही जणांची नावे बाद करण्याचा प्रयत्न असल्याचा संशय उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
मतचोरीचे सर्व पुरावे घेऊन येत्या काही दिवसात न्यायालयात जाणार अशी घोषणाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणूक येईल तशी भाजपची दडपशाही सुरू होईल, त्यामुळे आम्ही प्रमाणिकपणे कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोत, असे ते म्हणाले. मराठी माणूस, हिंदू आणि महाराष्ट्रासाठी आम्ही ठाकरे बंधू एकत्र आलोय. अशावेळी आम्ही पुढे जात असताना भक्कमपणे साथ देणे हे जनतेचे कर्तव्य आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण – शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी हा मोर्चा पाहून संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण आल्याचे सांगितले. “त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली. आपण स्वतःसाठी काही मागत नाही. आपण फक्त इतकंच बोलत आहोत की, लोकशाहीमध्ये संविधानाने जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला, त्याचे जतन करणे, याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीत जे काही प्रकार झाले त्यामुळे सामान्य माणसाचा संसदीय लोकशाहीवरील विश्वासाला धक्का बसला आहे,” असे शरद पवारांनी म्हटले.
राजकीय संघर्ष विसरून एक होण्याची वेळ
देशाची संसदीय लोकशाही ही टिकवायची असेल, मतदानाचा अधिकार टिकवायचा असेल तर तुम्हाला आणि मला एक व्हावे लागेल. आज व्यासपीठावर असलेले नेते याच भावनेतून एकत्र आले आहेत. असे स्पष्ट करून राजकीय मतभेत असतात, निवडणुकीत संघर्ष असतो. ते विसरून आता आता एक होण्याची गरज आहे. सत्तेचा गैरवापर सातत्याने केला जातो आहे. लोकशाहीचा जो अधिकार आणि मतांचा अधिकार जतन करण्यासाठी आपण सर्वांनी एक होण्याचा निर्धार केला पाहिजे, असे आवाहन सगार्ड पवार यांनी यावेळी केले.
बनावट आधारकार्ड करण्यात येत असल्याचे पुराव्यासह सिद्ध केल्यानंतर ज्याने आरोप केले त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्यात आले. याचा अर्थ हे शासन या सगळ्याला समर्थन देत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे – बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मतचोरी होत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणतीही चौकशी न करता थातूरमातूर उत्तर दिले. महाराष्ट्रातील निवडणुकाही अशाच बोगस मतदार यादीतून झाल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरली, ती स्थानिक स्वराज्य संस्थेला वापरू नका, असे आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले. नगर पालिकेसाठी मतदार याद्या जाहीर केल्या. विधानसभेच्या मतदार यादीत घोळ आहे. बोगस लोकांची नोंद आहे. ते तसेच ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे. मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजे, अशी आपली मागणी आहे, अशी बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली.
——-=
राज ठाकरे यांचा लोकल मधून प्रवास
सत्याच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी राज ठाकरे हे दादर हून चर्चगेटला लोकलने आले. तेथून चालत फॅशन स्ट्रीट येथे मोर्चात सहभागी झाले होते.

















