वेळापूर – माळशिरस तालुक्यातील वेळापूर हे गाव दोन राष्ट्रीय महामार्ग तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या संगमावर वसलेले असल्यामुळे व्यापारी, धार्मिक आणि वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र मानले जाते. मात्र एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी आजअखेर सुसज्ज एस.टी. बस स्थानकाची उभारणी न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे माळशिरस तालुकाध्यक्ष मिलिंद वाल्मीक सरतापे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सविस्तर निवेदन सादर केले. वेळापूर परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी तसेच वारकरी-भाविकांना बसस्थानकाच्या अभावामुळे होणाऱ्या अडचणी निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतीचा ठराव, नागरिकांची सातत्याने मागणी आणि परिवहन महामंडळाच्या नोंदणीमध्ये स्वतंत्र जागा उपलब्ध असतानाही प्रत्यक्ष कार्यवाही न झाल्याची खंत सरतापे यांनी व्यक्त केली.
सरतापे म्हणाले की, “एस.टी. बस स्थानक उभारले गेल्यास स्थानिकांसह तालुक्यातील हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. शिवाय एस.टी. महामंडळालाही महसुलात वाढ होणार आहे. मग तरीही शासन वेळापूरच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
सध्याची गंभीर अडचण : बस थांबे विस्कळीत, नागरिक त्रस्त अकलूज-वरून सांगोला कडे जाणारी बस वेळापूर बस स्टॉप ला थांबत नाहीत,आणि सांगोला – अकलूज – इंदापूर-पुणे वेळापूर बस स्टॉप ला जात नाही. तसेच पंढरपूर-सोलापूर मार्गावरील अनेक एस.टी.बस गाड्या वेळापूर चौकातून मार्गक्रमण करतात; मात्र त्या बस स्थानकावर थांबत नाहीत.
यामुळे वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थ्यांना, माताभगिनींना, रोजंदारी कामगारांना त्यांचा प्रवास धोकादायक आणि त्रासदायक बनला आहे. मिलिंद सरतापे तालुकाध्यक्ष रिपाइं म्हणाले, अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात तसेच पालखी चौकात एस.टी. थांबे निश्चित करण्याची तातडीची आवश्यकता असल्याचेही सरतापे यांनी स्पष्ट केले.
बसस्थानक झाल्यास होणारे लाभ :प्रवास व्यवस्था सुलभ व सुरक्षित.पालखी मार्गावरील वारकऱ्यांना मोठा दिलासा.व्यापार व्यवहारांना चालना.एस.टी. महामंडळाच्या महसुलात वाढ.तालुक्याच्या विकासात नवे पाऊल स्थानिक जनतेत आता शासनाकडून सकारात्मक व जलद निर्णयाची तीव्र अपेक्षा निर्माण झाली असून ही मागणी तालुक्यातील सर्वसामान्यांच्या जीवनमानाशी निगडित असल्याने ही कार्यवाही लांबणीवर न टाकता त्वरित मंजूर करावी, असा सूर जनतेत उमटत आहे.
















