बार्शी – तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी, दि. ७ फेब्रुवारी रोजी अत्यंत चुरशीच्या वातावरणात मतदान पार पडले. जिल्हा परिषदेच्या ६ जागा व पंचायत समितीच्या १२ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सायंकाळी उशिरापर्यंत काही मतदान केंद्रांवर मतदान सुरू होते. सरासरी 67.79 टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिलेली असून, अंतिम आकडेवारीत मतदानाची टक्केवारी सुमारे 68 टक्क्यांपर्यंत पोहोण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक गावात मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची वर्दळ दिसून आली. दुपारनंतर अनेक मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. महिला, पुरुष, युवक, ज्येष्ठ नागरिक अशा सर्व घटकांनी लोकशाहीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. अपंग व वयोवृद्ध मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती, त्यामुळे अशा मतदारांनीही मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावला.
तहसील कार्यालयामार्फत दर दोन तासांनी मतदानाची अधिकृतपणे आकडेवारी जाहीर करण्यात येत होती. सकाळी साडेसात ते साडेनऊ या पहिल्या दोन तासांत सरासरी ९ टक्के मतदान झाले. त्यानंतर साडेनऊ ते साडेअकरा या कालावधीत मतदानाची टक्केवारी वाढून २२ टक्क्यांवर पोहोचली. साडेअकरा ते दीड या वेळेत ही टक्केवारी ३८ टक्क्यांपर्यंत गेली. दुपारच्या सत्रात दीड ते साडेतीन या वेळेत ५१.५७ टक्के मतदानाची नोंद झाली, तर मतदानाच्या अखेरच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर पडल्याने अंतिम टक्केवारी ६८ टक्क्यांपर्यंत वाढली.
1) जिल्हा परिषदेच्या उपळाई (ठोंगे) गटात 71.78% मतदान झाले. तर पंचायत समितीच्या उपळाई (ठोंगे) गणात 75.9 % व आगळगांव गणात 67.57% मतदान झाले.
2) जिल्हा परिषदेच्या पांगरी गटात 67.19% मतदान झाले. तर पंचायत समितीच्या पांगरी गणात 64.29% व कारी गणात 70.12% मतदान झाले.
3) जिल्हा परिषदेच्या उपळे दुमाला गटात 67.52% मतदान झाले. तर पंचायत समितीच्या उपळे दुमाला गणात 66.69% व गौडगाव गणात 68.25% मतदान झाले.
4) जिल्हा परिषदेच्या पानगांव गटात 68.24% मतदान झाले. तर पंचायत समितीच्या बावी गणात 67.15% व पानगांव गणात 69.37% मतदान झाले.
5) जिल्हा परिषदेच्या मारवाडी गटात 66% मतदान झाले. तर पंचायत समितीच्या मालवंडी गणात 69.06% व सासूरे गणात 63.02% मतदान झाले.
6) जिल्हा परिषदेच्या शेळगांव (आर) गटात 66.53% मतदान झाले. तर पंचायत समितीच्या मानेगाव गणात 67.84 व शेळगांव (आर)पंचायत समिती गणात 65.37% मतदान झाले.
९५ वर्षांच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क
ग्रामीण भागात महिला व पुरुषांनी रांगा लावत शिस्तबद्ध पद्धतीने मतदान केल्याचे चित्र दिसून आले. विशेष बाब म्हणजे बेलगाव येथील ९५ वर्षांच्या वयोवृद्ध आजी मिनाबाई मारुती शेळके यांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावून सर्वांसमोर आदर्श ठेवला.
या निवडणुकीत आमदार दिलीप सोपल यांची प्रतिष्ठा व माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या अस्तित्वाचा प्रश्न केंद्रस्थानी राहिला.विस्तृतपणे बातमी बार्शी समाचार वर आहे. तसेच तालुक्यातील अनेक प्रमुख ग्रामीण नेते, पदाधिकारी व पुढाऱ्यांची आपापल्या गावांतील राजकीय पकड आणि प्रभाव या निवडणुकीच्या माध्यमातून कसोटीला लागलेला दिसून आला. यामध्ये पंचायत समितीचे माजी सभापती अनिल डिसले (ज्योतिबाची वाडी), माजी सभापती युवराज काटे (खामगाव), बाजार समितीचे सभापती विजय गरड (पांगरी), उपसभापती बाबासाहेब गायकवाड (शेळगांव आर), माजी जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे (भालगांव) आदींचा समावेश आहे.
वैराग भागाचे नेते संतोष निंबाळकर व वैराग नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांचा अनेक गावांवरील प्रभावही या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. मात्र, वैराग भागात शैक्षणिक संस्थांचे जाळे असलेल्या कै. बप्पासाहेब कोरके यांचे पुत्र डॉ. कपिल कोरके व यांचा गट या निवडणुकीपासून अलिप्त राहिल्याचे चित्र दिसून आले. ग्रामीण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वैराग भागात निंबाळकर, भूमकर, डिसले व कोरके हे चार गट नेहमीच निर्णायक भूमिका बजावत असल्याचे वास्तव पुन्हा अधोरेखित झाले.
बोगस आधार कार्ड व बोगस मतदार
दरम्यान, पांगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील कारी गावातील मतदान केंद्रावर मयत मतदाराच्या नावाने बोगस आधार कार्ड तयार करून बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीस आमदार दिलीप सोपल गटाच्या कार्यकर्त्यांनी पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली. या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, किरकोळ घटना वगळता तालुक्यात कुठेही गंभीर अनुचित प्रकार घडला नसून संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीतपणे पार पडली. निवडणूक निर्णय प्रशासन, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन, चोख बंदोबस्त व दक्षता घेतल्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार शांततेत पार पडल्याचे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
























