सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. माळशिरस तालुक्यात दिवसाढवळ्या दोघांची चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. नातेपुते-फोंडशिरस रस्त्यावरील महादेव मंदिरजवळ काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. नारायण विठ्ठल जाधव (वय ४२) आणि दुर्योधन नवनाथ निकम (वय २२) अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. दोघेही दहिगाव, चिकणेवस्ती येथील रहिवासी आहेत. या हत्येनंतर आरोपी फरार झाले असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.
ही हत्या किरकोळ कारणातून करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत नारायण याला दारूच्या नशेत आरोपींनी मारहाण केली होती. या मारहाणाचा जाब विचारण्यासाठी नारायण आणि दुर्योधन हे आरोपींकडे गेले होते. या दरम्यान, त्यांचा आरोपींसोबत वाद झाला. दरम्यान वाद इतका विकोपाला गेला, की आरोपींनी नारायण आणि दुर्योधन याच्यावर दिवसाढवळ्या चाकूने सपासप वार केले. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.