जून महिन्यातील पावसाने राज्यभरात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक रेल्वेमार्ग पाण्यात गेली आहेत. मुंबईतील माजगाव स्थानकावर पाणी भरल्याने सहा दिवसांपासून सोलापूर विभागातून धावणाऱ्या इंद्रायणी, हॉस्पेट-मुंबई या गाड्या एक ते तीन तास उशिरा धावत आहेत.पंधरा दिवसांपासून सोलापूरमार्गे मुंबई ते दक्षिण भागाकडे जाणाऱ्या आणि सोलापुरातून मुंबईकडे धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांना तास ते तीन तास उशिरा होत आहे.
२८ मे ते ३ जून या कालावधीत मुंबई रेल्वे स्थानक विस्तारीकरण कामासाठी ६४ तासांचा मेगाब्लाॅक घेण्यात आला होता. त्यामुळे काही रेल्वे उशिरा तर काही रेल्वे रद्द करण्यात आल्या.त्यानंतर रेल्वे सुरळीत होईपर्यंत पुन्हा ६ जूनपासून पावसामुळे रेल्वे उशिरा धावत आहेत. मुंबई परिसरात पाऊस अधिक असल्याने अनेक स्थानकावर पाणी भरले. त्याचा परिणाम गाड्यांच्या नियोजित वेळेवर झाला. सोलापूर विभागातून धावणाऱ्या, सोलापूरवरून ये-जा करणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांवर परिणाम झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.