पंढरपूर – चिपळूण मधील ‘श्रमिक सहयोग’ या संस्थेने उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल स.धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांच्या कडून या संस्थेचा उत्कृष्ट संस्था म्हणून गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे येथील स्वेरीचे माजी अध्यक्ष असलेले दादासाहेब रोंगे हे या चिपळूण येथील ‘श्रमिक सहयोग’चे संस्थापक विश्वस्त असून यापूर्वी अध्यक्ष म्हणून देखील या संस्थेची धुरा त्यांनी सांभाळली होती.
धर्मादाय सहआयुक्त कार्यालय, कोल्हापूर या विभागाच्या वतीने सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील पन्नास हजार संस्थांच्या नोंदी तपासून त्यातून ‘उत्कृष्ट’ कामगिरी करणाऱ्या तेरा (१३) संस्थाची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये ‘श्रमिक सहयोग, चिपळूण’ या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
उत्कृष्ट काम करणाऱ्या सार्वजनिक संस्थांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूरमध्ये करण्यात आले येथे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार ह्या होत्या. यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त शरद वाळके, विविध विधिज्ञ व पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बापू जाधव व सहकाऱ्यांच्या ‘महाराष्ट्र गीत’ गायनाने झाली. ‘श्रमिक सहयोग’ ही संस्था गेली ४० वर्षे सातत्याने वंचितांचे शिक्षण, महिला सबलीकरण, पर्यावरण संवर्धन आदी कामे करीत आली आहे.या कार्याचा थोडक्यात आढावा किरण पाटील यांनी घेतला.
‘श्रमिक सहयोग’ संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष अभियंता भार्गव पवार, माजी अध्यक्ष दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष प्रा.डॉ. गुलाबराव राजे व संस्थेचे हितचिंतक व देणगीदार आसिफ सय्यद यांनी यावेळी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे स्वरूप शाल, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ असे होते.
यावेळी संस्थेच्या वतीने श्रमिकचे हितचिंतक प्रमोद आसगावकर देखील उपस्थित होते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना धर्मादाय सह आयुक्त पवार यांनी ‘गेली तीन वर्षे सातत्याने अशा संस्थांचा शोध घेऊन हा उपक्रम राबवत असल्याचे सांगितले. यातून इतर संस्थांना प्रेरणा मिळेल तसेच ज्या संस्थामंध्ये समस्या आहेत त्यांनी अशा उत्कृष्ट संस्थांच्या कार्यातून बोध घ्यावा’ असे मत मांडले. यातून धर्मादाय कार्यालयाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल तसेच संस्थाच्या पाठीशी धर्मादाय कार्यालय भक्कमपणे उभे आहे हा संदेशही जाईल हे स्पष्ट केले. त्यावेळी जेष्ठ विधिज्ञ यांनी या सामाजिक संस्था मानव सेवेबरोबर समाज बांधणीचे काम करतात म्हणून अशा संस्थेतील कार्यकर्ते हे समाजासाठी “देवदूत”आहेत असे मत व्यक्त केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
———————
पुरस्कार प्राप्त तेरा संस्था पुढीलप्रमाणे आहेत
कोल्हापूर जिल्हा – यशोदर्शन फौंडेशन, ऊई फॉर सोल्दीर्स, मानव सेवा संस्था, सार्थ एज्युकेशन सोसायटी, श्री स्वामी समर्थ गोसेवा संस्था, जयसिंगपूर, वाचनकट्टा, कोल्हापूर व विकलांग सेवाभावी संस्था, नांदणी. सांगली जिल्हा- विवेकानंद वैदिक प्रतिष्ठान बामनोळी, मुकबधिर शाळा व अपंग सेवा केंद्र यांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्हा- श्रमिक सहयोग व कोव्यास चिपळूण तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सोशित मुक्ती अभियान संस्था, उमरमळा, ता. कुडाळ या संस्थेची निवड केली होती.


















