पंढरपूर – येत्या २६ ऑक्टोबर रोजी मंगळवेढा येथे होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याचे आणखीन एक खास वैशिष्ठ म्हणजे या सोहळ्याच्या निमित्ताने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांची उपस्थिती निश्चित झाली आहे. त्यामुळे या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
मंगळवेढा येथील या भव्य सोहळ्याचे आयोजन भाजपचे पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान अवताडे यांनी केले आहे. या कार्यक्रमा संदर्भात माहिती देताना आमदार आवताडे यांनी सांगितले की, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनाही या कार्यक्रमासाठी अधिकृत निमंत्रण देण्यात आले आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे त्यांनी देखील मान्य केले आहे,” विशेष म्हणजे या दोघांबरोबरच या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार तसेच सर्व पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचेही अवताडे यांनी सांगितले.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्माचे आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याने या अनावरण सोहळ्याला सर्वच पक्षाचे नेते आणि समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर दिसणार का ? हे येत्या २६ ऑक्टोबरलाच या पुतळा अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने स्पष्ट होईल.
———————
जरांगेचीही कार्यक्रमास मान्यता
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील एका स्टेजवर दिसणार असल्यामुळे या कार्यक्रमाचे राजकीय महत्त्व प्रचंड वाढले आहे. पुतळा समितीचे सदस्य कौंडू भैरी यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर योग्य तो न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे जरांगे दादांनीही या अनावरण सोहळ्यास उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे.
———————
राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले नव्हते. ओबीसी समाजाची नाराजी वाढू नये म्हणून सरकारने त्या वेळी सावध भूमिका घेतली होती. मात्र, आता दोघेही एकाच व्यासपीठावर येणार असल्याने राजकीय वर्तुळात याबाबतची जोरदार चर्चा रंगली आहे.


















