मुंबई : पवईच्या जय भीम नगरमधील घरे तोडून बेघर केलेल्या ६०० मागासवर्गीय कुटुंबांच्या तात्पुरत्या निवा-याची सोय सरकारने त्याच ठिकाणी करावी, अशी मागणी माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तस पत्र लिहिले आहे. ६ जून रोजी सकाळी १० वा. महानगरपालिकेच्या एस विभागातील अधिकारी, पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक विकासक यांनी हिरानंदानी पवई येथील ६०० मागासवर्गीय कुटुंबियांची घरे नियमबाह्यपणे पोलिसी बळाचा वापर करून पाडली. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हजारो लोक बेघर झाले आहेत.
त्यात महिला, विद्यार्थी लहान मुले मुलींचाही समावेश आहे. हे रहिवाशी ३० वर्षापासून येथे रहात होते. त्यांच्याकडे राहण्याची कुठलीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे हे सगळे लोक नाईलाजाने फुटपाथवर जिथे जागा मिळेल तिथे राहात आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, त्याची सुनावणी मंगळवार 25 जून रोजी आहे.
वरील सर्व परिस्थितीचा विचार करून तसेच मानवीय दृष्टीकोनातून आपण या ६०० कुटुंबियांची त्याच ठिकाणी निवा-याची सोय करावी अशी मागणी नसीम खान यांनी केली.