बार्शी – प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या बार्शी सेवाकेंद्रामध्ये महाशिवरात्री निमित्त शिवध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास नूतन उपनगराध्यक्ष रोहित पाटील व नूतन नगरसेविका कांचन मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सेवाकेंद्र संचालिका संगीता दिदींनी युवाशक्ती व नारीशक्ती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिल्याचा आनंद व्यक्त करत महाशिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य स्पष्ट केले.
संगीता दिदी म्हणाल्या की, सध्याच्या काळात सुखप्राप्तीची अनेक साधने उपलब्ध आहेत; परंतु शांतीच्या अभावामुळे हे सुख क्षणभंगुर ठरते. शांती ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज असून प्रत्येक जण तिच्या शोधात आहे. शांतीसाठी व्यर्थ संकल्पांपासून मुक्त राहणे आवश्यक आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून आहार बदलाचे व्रत केले जाते, त्याचप्रमाणे व्यर्थ व नकारात्मक संकल्पांपासून कायमस्वरूपी दूर राहण्याचे व्रत अंगीकारावे. शांतीची प्राप्ती झाल्यानंतर अविनाशी सुखाची अनुभूती आपोआप मिळते.
महाशिवरात्रीचे रहस्य स्पष्ट करताना त्या म्हणाल्या की, जेव्हा धर्मग्लानी होते तेव्हा परमात्मा सत्यधर्माची स्थापना करण्यासाठी अवतरित होतो. निराकार ज्योतिर्बिंदू शिव परमात्म्याचा मातृगर्भातून जन्म होत नाही, तर १९३६ साली प्रजापिता ब्रह्माबाबांच्या शरीरात परकाया प्रवेशाद्वारे परमात्म्याचे दिव्य अवतरण झाले. तेव्हापासून शिव परमात्मा अखिल विश्वात ज्ञानप्रकाश पसरवत आहे. अज्ञानाच्या अंध:कारमय रात्री ज्ञानसूर्याचा हा दिव्य जन्म असल्यामुळे त्याला “शिवरात्री” असे म्हटले जाते.
वैराग उपसेवाकेंद्र संचालिका मीरा दिदींनी शिवरात्री निमित्त उपस्थितांकडून दृढ प्रतिज्ञा करून घेतल्या. साक्षीभावात राहणे, शुभभावना ठेवणे, मधुर वाणीने व्यवहार करणे, चिंता व व्यर्थ चिंतनापासून मुक्त राहणे, स्वराज्य अधिकारी बनून मन-बुद्धीवर नियंत्रण ठेवणे, तसेच परचिंतन व परमतापासून दूर राहणे अशा संकल्पांचा त्यात समावेश होता.
उपनगराध्यक्ष रोहित पाटील म्हणाले की ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात प्रवेश करताच शांतीची अद्भुत अनुभूती झाली. संस्थेचे कार्य समाजात पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू.
ब्र. कु. निशादिदींनी महाशिवरात्री निमित्त “सदा आनंदी राहा” असा संदेश दिला. ब्र. कु. अनितादिदी करवा यांनी सूत्रसंचालन करत निर्देशित ध्यान गाईडेडमेडाटेशन करून घेतले.
विद्यालयामार्फत दोन्ही अतिथींचा सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत शिवध्वजारोहण करून कार्यक्रमाची सांगता झाली.
























