पंढरपूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेला नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपूर, सांगोला, मोहोळ तालुक्यातील शेतकर्यांनी विरोध केला आहे. पूर्वीच्या रेखांकानुसारच हा महामार्ग तयार करावा, अशी मागणी या भागातील शेतकर्यांनी आज केली आहे.
हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गात सोलापूर पासून बदल करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता या मोहोळ, पंढरपूर, सांगोला, आटपाडी भागातील शेतकर्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध नसल्याचे सांगत आमच्या जमिनी द्यायला आम्ही तयार असल्याचे सांगितले.
शक्तीपीठ महामार्ग समर्थनार्थ शुक्रवारी (ता.२६ ) पंढरपुरात शेतकर्यांची बैठक झाली. या बैठकीत शेतकर्यांनी शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास विरोध केला आहे. बैठकीला आमदार राजू खरे, आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, पंचायत समितीचे माजी उपसभापती विजयसिंह देशमुख,भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष मस्के, शेकापचे नेते अनिकेत देशमुख आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रशांत परिचारक म्हणाले की शक्तिपीठ महामार्गामुळे सोलापूर जिल्ह्यातील विकासाला चालना मिळणार आहे. शक्तिपीठ महामार्ग मंजूर झाल्यानंतर मी स्वतः या भागातील अनेक शेतकऱ्यांना विरोधी भूमिका घेऊ नका असे सांगितले होते. त्यानंतर या भागातील शेतकऱ्यांनी सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती परंतु अचानक सरकारने पंढरपूर सांगोला मोहोळ या भागातून महामार्ग बदलून तो माढा, माण, आणि खटाव या भागातून नेण्याचा विचार सुरू आहे.
पूर्वीप्रमाणेच हा महामार्ग व्हावा अशी आमची मागणी आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नक्कीच आमच्या मागणीचा विचार करून पूर्वीप्रमाणेच हा महामार्ग करण्यास मान्यता देतील असा आमचा ठाम विश्वास आहे. शेतकऱ्यांनी सरकारच्या चांगल्या प्रकल्पांना सहकार्य करावे असे आवाहनही परिचारक यांनी केले.
दरम्यान बैठकीनंतर शेतकऱ्यांनी येथील प्रांत कार्यालयावर हलगीनाद मोर्चा काढून प्रांताधिकारी सचिन इथापे यांना निवेदन ही दिले.
——————-
शक्तिपीठ महामार्गामध्ये माझी स्वतःची चार एकर शेती एक विहीर जाणार आहे मी स्वतः या महामार्गासाठी माझी शेती द्यायला तयार आहे. माझ्या शेतातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असल्याने माझी शेती तीन वर्षांपासून पडीक आहे मात्र सध्या सरकारने महामार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे सरकारच्या निर्णयामुळे आमचे मोठे नुकसान होणार आहे. सरकारने पूर्वी प्रमाणेच महामार्ग तयार करावा अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू
विनायक कुलकर्णी, ( समर्थक शेतकरी मांजरी ता.सांगोला )
—————————
दलाल मंडळींनी केली नेते मंडळींची दिशाभुल : भाजपाचे किसान मोर्चाचे सरचिटणीस हळणवर
शक्तीपीठ महामार्ग व्हावा ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा आहे. या रस्त्यामुळे महाराष्ट्रा बरोबरच सोलापूर जिल्ह्याचा देखील विकास व्हावा, सर्व शक्तीपीठे या महामार्गाला जोडली जावीत यासाठी मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न होता. पण सोलापूर जिल्ह्यातील किंवा इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांनी याला प्रचंड विरोध केलेला होता. त्यामुळे पूर्वीचे रेखांकन बदलून दुष्काळी पट्ट्यातून नवीन रेखांकन करण्याची भूमिका आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे या त्यांच्या भूमिकेचे शेतकऱ्यांमधून स्वागत केले जात आहे. मात्र पंढरपूर मध्ये काही दलाल मंडळींनी येथील नेते मंडळींची दिशाभूल करुन जुन्या रेखाकंनाच्या शक्तीपीठ महामार्गाला पाठिंबा असल्याचे सांगत शुक्रवारी (ता.२६) एक बैठक घेवून नवीन शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकनाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे ही भूमिका या दलाल मंडळींची आहे. शेतकऱ्यांची नाही. शेतकऱ्यांनी नवीन रेखांकनाचेच स्वागत केल्याचे भाजपाचे किसान मोर्चाचे सरचिटणीस माऊली हळणवर यांनी सांगितले. या बरोबरच शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ या भागातील शेतकऱ्यांनी एकजूट दाखवली आहे. दरम्यान सरकारने जो महामार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. सरकारच्या या नव्या निर्णयामुळे माण,खटाव आदी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचेही माऊली हळणवर यांनी सांगितले.

























