पंढरपूर – जेव्हा नव्हते चराचरा तेव्हा होते पंढरपूर । जेव्हा नव्हती गोदागंगा तेव्हा होती चंद्रभागा ।। असे संतांनी शेकडो, हजारो वर्षापूर्वी पंढरीचा आणि पंढरीतील पवित्र अशा चंद्रभागा नदीचा महिमा वर्णिला आहे. मात्र आज स्थानिक लोकप्रतिनिधी, त्यांचे बगलबच्चे असलेले ठेकेदारमंडळी आणि त्याच बरोबर फक्त स्वत:च्या आर्थिक विकासा पुढे फारसे कशातच स्वरास्य नसलेल्या सरकारी बांबूच्या ( प्रत्येक गोष्टीसाठी कराव्या लागणाऱ्या ) अर्थपुर्ण मैत्रीच्या संबंधामुळे भारताची दक्षिण काशी म्हणून नावलोकीक असलेल्या तिर्थक्षेत्र पंढरीची अवस्था बकाल आणि दयनीय अशी झालेली दिसत आहे.
येथील विठुरायाच्या पावन वास्तव्यामुळे तिर्थक्षेत्र पंढरीचा महिमा आज सातासमुद्रापार गेलेला आहे. देशविदेशातून विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीमुळे असंख्य भक्तांची येथे नेहमीच वर्दळ सुरु असते. दरवर्षी आषाढी, कार्तिकीसह इतर यात्रांच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भक्तांची येथे रिघ लागलेली दिसून येते.
विशेषत: आषाढी यात्रेच्या काळात सांस्कृतिक सोहळा म्हणून परिचित असलेल्या विविध संतांच्या पालखी सोहळ्यांमधून देखील लाखोंच्या संख्येने भक्तांची मांदियाळी येथे हजेरी लावित असते. मात्र येथे आल्यावर सावळ्या विठुरायाच्या दर्शनामुळे तृप्त आणि समाधानी झालेला भाविक याच विठ्ठलाच्या पंढरीच्या दर्शनाने मात्र अतृप्त,असमाधानी होतो. त्याचे कारण म्हणजे या पंढरीची झालेली दयनीय अवस्था हेच होय.
पंढरीच्या या दयनीय अवस्थेला कारणीभूत आहेत ती हजार, पाचशे रुपयांमध्ये निवडणूकी मध्ये आपली मते विकणाऱ्या पंढरपूरातील बहुसंख्य नागरिकांबरोबरच राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील मंडळी,सर्वपक्षीय स्थानिक राजकीय मंडळीं तसेच या सर्व मंडळींचे बगलबच्चे असलेले विविध प्रकारची सरकारी कामे करणारी ठेकेदार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व मंडळींच्या तोंडाला पैशाची चव चाखावयास लावणारी गल्लीपासून ते अगदी मुंबई (मंत्रालया ) पर्यंतचे सरकारी बाबु अर्थात सरकारी अधिकारी आदी मंडळी होय.
कारण मुंबई, पुण्या सारख्या महानगरात असलेल्या आपल्या अलिशान एसी कार्यालया मध्ये बसून ही मंडळी तिर्थक्षेत्र पंढरीतील विकासाच्या योजना आखतात.स्थानिक पातळीवर पंढरपूरा मध्ये काय विकास करावयाचा, इथली भौगोलीक परिस्थिती काय आहे, इथल्या लोकांना कोणत्या प्रकारचा विकास अपेक्षीत आहे. इथल्या लोकांच्या गरजा काय आहेत. यात्रांच्या काळात इथली परिस्थिती काय असते, या शहराचा मुळ गाभा काय आहे. या शहराला असलेला पारंपारिक वारसा,इथल्या सांस्कृतिक रुढी, परंपरा याचा कोणताही अभ्यास न करता कोट्यावधी रुपयांच्या निधीची घोषणा करीत योजनेला छानछुक नावे देत पंढरीच्या विकासाच्या निरर्थक योजना राबवुन पंढरीचा विकास साध्य होत नाही. पंढरीचा विकास साधायचा या आज पर्यंत झालेल्या चुकीच्या विकास कामांच्या पध्दतीमुळे खऱ्याखुऱ्या विकासा पासून अध्यात्मिक पंढरीनगरी अद्यापही कोसो दूर असल्याचेच दिसत आहे.
कारण या अध्यात्मिक नगरी असलेल्या पंढरपूर शहरात भाविकांचा प्रवेश होतो त्यावेळी त्याचे स्वागत आनंददायी किंवा सुखकारी होण्या ऐवजी चक्क बोकडाच्या,कोंबड्याच्या उलट्या टांगलेल्या धडांनीच अर्थात मटन मार्केट आणि त्या आसपास असलेल्या मटन विक्रीच्या दुकानांनीच होते. त्यानंतर भाविक पुढे शहरात आल्यावर त्याला दर्शन होते ते शहरातील अरुंद रस्ते, त्याच अरुंद रस्त्यावर चौकाचौकात अक्षरश: भरुन वाहणारी कचरा कुंडे,या बरोबरच सर्वत्र असलेली अस्वच्छता, तुंबलेली गटारे, घाणेरडा वास मारणारी भुयारी गटारे दिसुन येतात.
यात दळभद्रीपणा मध्येच भरीस भर पडते ती शहरातील दर्जाहिन झालेल्या सिमेंटच्या रस्त्यांची कामे, त्या निकृष्ट कामांमुळे रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे, त्यामधील धुळ आणि ड्रेनेजच्या वरखाली बसविण्यात आलेल्या झाकणांनी अक्षरश: भाविकांच्या स्वागतासाठी जणू काही रस्त्यांवर रांगोळीच साकारण्यात आल्याचा भास व्हावा तसे चित्र पंढरीतील सर्वच सिमेंटच्या प्रमुख रस्त्यावर दिसुन येते.
या शिवाय जुन्या गावठावण अर्थात गाव भागात तर विचारायची सोय नाही असा एकंदरीत दळभद्रीपणा शहरवासियांच्या तसेच भाविकांच्या नित्याचाच झालेला दिसुन येतो.कारण सर्रास गल्लीबोळातून कुठे तरी पिण्याच्या फुटलेल्या पाईप, त्या मधुन रस्त्यावर वाहणारी पाण्याची कारंजी, तशातच प्रत्येक गल्ली मध्ये एक, दोन घरे सोडून कुणीही कशा पध्दतीने पाण्याचा निचरा होण्यासाठी तयार केलेली गटारे,भुयारी गटारांवर चौकाचौकात लोखंडाच्या जाळ्या नसलेली ड्रेनेजची उघडी मोठाली चेंबर्स, रस्त्यांवरुन मोकाट कळपाने फिरणारी मोकाट कुत्री, डुकरे तसेच पाळीव जनावरे हे अगदी विना भेदभाव सगळीकडे वावरताना दिसतात. या बरोबरच शहराच्या प्रत्येक चौकाचौकात अनाधिकृतपणे लावण्यात येत असलेले मोठाले डिजीटल बोर्ड देखील शहराच्या बकालपणात निश्चितच भर घालत असल्याचे दिसतात.
————————
नागरिकांनी योग्य उमेदवारांना संधी द्यावी –
सध्या शहरात नगरपरिषद निवडणूकीचे वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. पैशावर आपले मत विकता कामा नये. कारण आपण एकदा संधी गमावली तर पाच वर्षे पुन्हा आपण विकासा पासून दूर राहू. त्यामुळे आज पर्यंत शहर विकासाबाबत आपण ज्या चुका केल्या त्या इथुन पुढच्या काळात तरी करायला नको आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे खरोखरच शहर विकासाची दृष्टी आहे अशाच मंडळींना मत देवून पंढरपूर नगरीचा खऱ्या अर्थाने विकास करणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदान करताना प्रत्येक पंढरपूरकराने विचारपूर्वक मतदान करुन योग्य उमेदवाराला संधी देण्याचे पवित्र काम निश्चितच आपण सर्वजण मिळून पार पाडूयात आणि पंढरपूरचा खऱ्या अर्थाने विकास करुयात.
—————————-
चंद्रभागेचे पावित्र् जपणे आवश्यक –
पंढरी नगरी मध्ये आल्या नंतर भाविक प्रथम चंद्रभागेचे स्नान करतो. त्या नंतरच तो विठ्ठल दर्शनासाठी जात असतो. मात्र इथे चंद्रभागा नदीचे पावित्र्य कुठेही जपले किंवा राखले जात असल्याचे दिसत नाही. कारण चंद्रभागेच्या पात्रात बऱ्याचदा शहरातील ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याचे दिसुन येते. या बरोबरच चंद्रभागेच्या पात्रात वाळु चोरांनी अक्षरश: वाळु चोरुन पात्राला मोठाले खड्डे पाडलेले आहेत. चंद्रभागा स्नान करीत असताना पात्रातील या खड्यांचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नदीपात्राकडे जाणाऱ्या घाटांची देखील दूरवस्था झाली आहे.वाळवंटाची देखील नियमीत सफाई होत नसल्याने वाळवंटात दशक्रिया विधी नंतरचे पडलेले केस, ब्लेडची पाने, सर्वत्र पडलेले जुने कपडे,नदीपात्रांमध्ये भगंलेल्या देवदेवतांच्या मुर्ती अस्ताव्यस्त पडलेले शिळ्याअन्नांचे ढिगारे दिसुन येतात. या शिवाय चंद्रभागेच्या वाळवंटात उघड्यावरच मरणपावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना दिवसकार्य पार पाडावी लागतात. सर्वात महत्वाचे म्हणजे चंद्रभागा नदीपात्रात अजून देखील मृतदेहाला बडवुनच त्याला अग्नी देण्याची अजूनही इथे परंपरा आहे. त्यामुळे देखील चंद्रभागा नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होते.
—————————-
विठ्ठलरुक्मिणी मंदिरा भोवती अतिक्रमणे –
येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरा भोवती अगदी चौफाळ्या पासून ते महाव्दारा पर्यंत सतत भाविकांची गर्दी असते. या मध्येच व्यापारी मंडळींची अतिक्रमणे, फेरीवाले, हातगाडीवाले तसेच भिकारी मंडळी ठाण मांडून बसलेली दिसुन येतात. त्यामुळे देखील येथील रस्ते रुंदी असूनही अरुंद भासतात. त्यामुळे मंदिर परिसराभोवती पोलिसांनी, नगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधी मोहिम राबवुन कायमस्वरुपी ही समस्या दूर करणे गरजेचे आहे.
—————————
पार्किंगच्या समस्या –
पंढरपूरा मध्ये भरणाऱ्या चार प्रमुख यात्रांच्या काळात तसेच दररोज विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी भाविकांची गर्दी होत असते. त्या मानाने पंढरीनगरीत भाविकांच्या वाहनांसाठी वाहनतळांची पुरेशी सोय नाही. त्यामुळे पुण्या,मुंबईच्या धर्तीवर विठ्ठल मंदिर तसेच शहराच्या चार बाजूला मंदिरा पासून काही अंतरावर बहुमजली वाहनतळांची व्यवस्था होणे गरेजेचे आहे. वाहनतळा अभावी शहरात रस्त्यांवर खुलेआम वाहने लावली जातात. त्यामुळे शहरात वारंवार वाहनांची सतत कोंडी होते.
————————–
नगरप्रदक्षिणा करीता भाविकांना त्रास –
भाविकांकडून अनवाणी पायाने नगरप्रदक्षिणा केली जाते. मात्र नगरप्रदक्षिणा मार्गावर रस्त्यांना खड्डे पडल्याने या खड्यांमधून अक्षरश: कचखडी कोंबली जाते. त्यामुळे भाविकांना नगरप्रदक्षिणा करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. या शिवाय गोपाळकृष्ण मंदिर ते नाथचौक या भागात दगडी मुर्तीकारांचे अनेक कारखाने आहेत. सर्रास ही मंडळी रस्त्यांवरच मुर्ती घडविण्याचे काम करतात. त्यामुळे देखील रस्त्यावर टोचणारे दगड तसेच धुळ विखुरली जाते. त्याचा देखील त्रास नगरप्रदक्षिणा करणाऱ्या भाविकांना सहन करावा लागतो.
———————
पदपथ मोकळे ठेवणे आणि सिंग्लन व्यवस्था करणे –
शहरातील प्रमुख रस्त्यांवर नागरिकांना चालण्यासाठी असलेले पदपथ छोट्या व्यापाऱ्यांनी व्यापलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथावरुन चालण्याची सवयच राहिलेली नाही. पदपथावर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना चक्क रस्त्यांवरुनच चालावे लागते.या बरोबरच वाहतूकीच्या नियोजनासाठी चौकाचौकात स्वयंचलित सिंग्नल व्यवस्था देखील कार्यान्वीत करणे गरेजेचे आहे. या बरोबरच मुख्य रस्त्यांवरील डिव्हायडर मधील झाडांची नेहमीच देखभाल करणे या बरोबरच मध्यभागी बसविलेल्या वारकरी पुतळ्यांची नियमित निगा राखणे जरुरीचे आहे.


















