नवी दिल्ली, 22 जुलै (हिं.स.) : देशाची अर्थव्यवस्था वेगाने पुढे जाणे ही गर्वाची बाब आहे. जनतेने विश्वास टाकून विजयी केलेल्या खासदारांनी पुढील साडेचार वर्षे पक्षासाठी नव्हे तर देशासाठी लढावे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेय. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेत जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना आगामी साडे चार वर्ष देशासाठी समर्पित करण्याचा सल्ला दिला. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत असून उद्या अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान म्हणाले की, विरोधकांनी आता जानेवारी 2029 मध्ये मैदानात यावे. तुम्हाला 6 महिने जे काही खेळ खेळायचे आहेत ते खेळा परंतु तोपर्यंत देशातील गरीब, शेतकरी, युवा आणि महिला यांच्या प्रगतीसाठी काम करा.
आगामी 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही ताकदीने प्रयत्न करत आहोत. अनेक खासदारांना संसदेत त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी मिळाली नाही. काही नकारात्मक राजकारण करणाऱ्यांनी त्यांचं अपयश झाकण्यासाठी संसदेच्या सभागृहाचा गैरवापर केला. त्यामुळे नव्या खासदारांना संधी मिळावी. त्यांना बोलायला वेळ मिळावा आणि जास्तीत जास्त लोक पुढे येऊ द्या असे आवाहन पंतप्रधानांनी केले. तसेच ज्यांना सरकार चालवण्याचा जनादेश मिळाला त्यांचा आवाज सभागृहात दाबण्याचा याआधीच प्रयत्न झाला हे सर्वांनी पाहिले. अडीच
तास पंतप्रधानांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न झाला. देशातील जनतेने देशासाठी आपल्याला इथे पाठवले आहे याचा विचार करायला हवा. विरोधकांचा विचार चुकीचा नाही परंतु नकारात्मक विचार वाईट आहे. जनता बारकाईने आपल्या कामाकडे पाहत आहे. एनडीए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिले बजेट सादर करणे ही गर्वाची गोष्ट असल्याचे मोदींनी सांगितले.
दरम्यान, मी देशवासियांना जी गॅरंटी दिली आहे ती प्रत्यक्षात अंमलात आणणारं हे बजेट असेल. अमृतकाळातील हा
महत्त्वाचा अर्थसंकल्प असणार आहे. आम्हाला 5 वर्ष संधी मिळाली आहे त्याची दिशा ठरवणारा हा बजेट असेल. आगामी 2047 मध्ये विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पाया रचणारा हा अर्थसंकल्प असेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केलाण्