मंगळवेढा – छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच बादशाहींविरोधात संघर्ष करून सर्व समाजघटकांना सोबत घेत आदर्श राज्यव्यवस्था उभी केली आणि स्वराज्याची स्थापना केली. आजच्या तरुण पिढीने केवळ शिवजयंतीच्या गर्दीपुरते मर्यादित न राहता शिवचरित्र डोक्यात घेऊन त्यातील आदर्श विचार आत्मसात करावेत, असे प्रतिपादन धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे यांनी केले.
मंगळवेढा येथे धनश्री परिवाराच्या प्रशासकीय कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रा. शोभाताई काळुंगे बोलत होत्या. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक घालण्यात आला. त्यानंतर पुष्पहार अर्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, ज्ञानदेव जावीर, कल्याण रोकडे, ज्ञानेश्वर कांबळे, रामचंद्र बंडगर, धनश्री पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे, सिताराम महाराजांचे व्यवस्थापक लक्ष्मण पवार यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पुढे प्रा. काळुंगे म्हणाल्या, स्वराज म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर रयतेच्या हितासाठी उभारलेली न्याय, समानता आणि जबाबदारीची व्यवस्था होय. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य हे सत्तास्थापनेपुरते मर्यादित नव्हते; ते लोकशाही मूल्यांवर आधारलेले, न्याय आणि समतेचा ध्यास घेतलेले होते.
विविध धर्म, जाती आणि समाजघटकांना एकत्रित करून त्यांनी लोकाभिमुख राज्यकारभार उभा केला. त्यांच्या राज्यकारभारात रयतेचा सन्मान, स्त्रीसुरक्षा, शेतकऱ्यांचे संरक्षण आणि प्रशासनातील पारदर्शकता यांना विशेष महत्त्व होते. त्यामुळे शिवचरित्र हे केवळ इतिहासाचे पान नसून प्रेरणेचा अखंड झरा आहे. शिवचरित्राचा बोध घेतल्याशिवाय आणि त्यातील मूल्ये आचरणात आणल्याशिवाय खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होत नाही. असे त्यांनी सांगितले.
प्रा. शिवाजीराव काळुंगे म्हणाले, मंगळवेढ्यात यंदा सुवर्ण महोत्सवी शिवजयंती उत्साहात साजरी होत असून, विविध सांस्कृतिक व ऐतिहासिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आलेल्या मान्यवरांकडून या शिवजयंतीचे कौतुक होत आहे. आजपर्यंत मंगळवेढा शहरात एकच शिवजयंती साजरी होते, हीच शिवचरित्राची खरी शिकवण असून यातून शिस्त, एकोपा आणि कर्तव्यभावना निर्माण होते.
इतिहासाची साक्ष देणारे शहर म्हणून मंगळवेढ्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, येथील भुईकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुक्काम केला होता. या ऐतिहासिक स्मृतीचे जतन करण्यासाठी लोकसहभागातून शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्यासाठी धनश्री परिवाराने सर्वाधिक सहभाग दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.























