काल मृत्यू दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो, अशा भावना निखिल वागळे यांनी फेसबुकवरुन व्यक्त केल्या आहेत.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे प्रवास करत असलेल्या गाडीवर काल पुण्यात हल्ला झाला. या हल्ल्यातून वागळे थोडक्यात बचावले. पुण्यातील दांडेकर पुलानजीक असलेल्या राष्ट्र सेवा दलातील सभागृहात वागळे यांच्या ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजन केले होते. त्या सभेला जात असतानाच डेक्कन येथील खंडुजीबाबा चौकात त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी फेसबुक पोस्ट शेअर करत वागळेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
काल मृत्यू दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो, अशा भावना निखिल वागळे यांनी व्यक्त केल्या आहेत. आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलिसांच्या संगनमताने हा हल्ला झाला, असा आरोपही वागळेंनी केला आहे.
काय आहे निखिल वागळे यांची फेसबुक पोस्ट? वाचा जसेच्या तसे
प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो,
काल मृत्यू दारात दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो.
मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..कॅांग्रेसचे अरविंद शिंदे, वंचित आणि आपचे कार्यकर्ते, धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे.
आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला.
काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशिर्वादाने ही माझी श्रद्धा आहे.
आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो.
तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू?
जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही. संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच.
तुमचा,
निखिल
महाराष्ट्राचे पोलीस दल हे भाजपने विकत घेतलेले आहे. रश्मी शुक्ला यांना ज्यांनी पोलीस महासंचालक केले, त्या पोलीस दलाला काही नैतिकता राहिलेली नाही, अशा शब्दात निखिल वागळे यांनी काल महाराष्ट्र पोलिसांना लक्ष्य केले होते.