मुंबई – शेकडो कोटीचे कर्ज, थकीत वेतन, नादुरुस्त आणि निकामी गाड्या अशा नकारात्मक बाबीमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाला (एसटी )यंदाचा दिवाळी हंगाम मात्र पावला आहे. दहा दिवसात एसटीने तब्बल ३०१ कोटीची कमाई केली आहे. गेल्या वर्षापेक्षा 31 कोटी अधिक उत्पन्न मिळविले. यंदा राज्यात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने मिळवले तर त्यानंतर जळगाव व नाशिक विभागाने द्वितीय व तृतीय क्रमांकांची कमाई केली आहे.
दिवाळीच्या १८ ते २७ आक्टोबर या १० दिवसात राज्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात प्रवास केला. त्यामुळे एसटी महामंडळाला दररोज सरासरी ३० कोटीप्रमाणे ३०१ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे दिवाळी सुटीच्या परतीच्या दिवशी २७ ऑक्टोबरला ३९ कोटी ७५ लाख रुपये उत्पन्न मिळवुन या वर्षातील सर्वाधिक उत्पन्नाचा नवा विक्रम केला आहे.
एसटीच्या ३१ विभागात सर्वाधिक उत्पन्न पुणे विभागाने आणले असून (₹२० कोटी ४७ लाख) त्यानंतर जळगाव (₹१५कोटी ६० लाख) आणि नाशिक (₹१५ कोटी ४१ लाख ) विभागाचा क्रमांक लागतो. मागील वर्षीच्या दिवाळी हंगामाच्या पेक्षा यंदा महामंडळाने तब्बल ३७ कोटी रुपये उत्पन्न जास्त आणले आहे.
अपेक्षित लक्ष गाठण्यास एसटीला अपयश
यंदाच्या आर्थिक वर्षांमध्ये एप्रिल व मे हे दोन महिने वगळता गेली चार महिने एसटी महामंडळाला सातत्याने तोटा सहन करावा लागत आहे. अवकाळी पाऊस आणि पूर परिस्थिती यामुळे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये महामंडळाला सुमारे १५० कोटी पेक्षा जास्त तोटा सहन करावा लागला. परंतु ऑक्टोबर महिन्यात दिवाळीचा हंगाम व सुट्ट्यांच्या कालावधीमुळे उत्पन्नात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रतिदिन ३४ कोटी रुपये याप्रमाणे ऑक्टोबर महिन्यात १०४९ कोटी रुपये उत्पन्न मिळविण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले होते. तथापि, ऐन दिवाळीचे काही मोजके दिवस सोडता दैनंदिन लक्ष गाठणे महामंडळाला शक्य झाले नाही. पुणे, बीड, अहिल्या नगर अमरावती, बुलढाणा या विभागांनी मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीमध्ये चांगले उत्पन्न आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु सिंधुदुर्ग, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, धाराशिव यासारख्या विभागांनी मात्र अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे महामंडळाच्या एकूण उत्पन्नावर विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते.
 
	    	 
                                


















 
                