देगलूर / नांदेड : देगलूर तालुक्यातील “होट्टल रस्त्यावर अवघ्या चार दिवसांत पाच अपघात; एक ठार, अनेकजण जखमी” या मथळ्याखाली दि. 22 डिसेंबर 2025 रोजी “तरुण भारत” दैनिकात बातमी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर दि. 26 डिसेंबर 2025 रोजी “तरुण भारतच्या बातमीची तरुणांनी घेतली दखल; प्रशासन जागे झाल्यास कायमस्वरूपी तोडगा निघणार!” अशी दुसऱ्यांदा बातमी प्रकाशित करण्यात आली. या दोन्ही बातम्यांचा चांगलाच इम्पॅक्ट प्रशासनावर पडला. झोपेत असलेले प्रशासन जागे होत धोकादायक असलेल्या होट्टल रस्त्यावर तातडीने सुचनाफलक, दिशादर्शक फलक आणि ज्याठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्ता खाचला होते त्याठिकाणी मुरुम टाकण्यात आले. तरुण भारतच्या बातमीने प्रशासनाचे डोळे उघडले तर जनसामान्यांच्या विश्वासार्हता वाढली.
दरम्यान होट्टल फाटा ते होट्टल आणि पुढे करडखेड गावाजवळपास रस्ता नव्याने करण्यात आला. त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने लिंगनकेरुर चढावाजवळचा रस्ता पुर्णपणे खचला गेला आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. यावर तात्पुरला उपाय म्हणून स्थानिक लोकांकडून काही दगड ठेवून धोका असल्याचे दर्शविण्यात आले. परंतु रात्रीच्या वेळी हे दगड न दिसल्याने अपघाताचे सत्र सुरू झाले. याठिकाणी एकाचा जागीच मृत्यू आणि अनेकजण गंभीर जखमी झाले. या अनुषंगाने दैनिक तरुण भारतने “होट्टल रस्त्यावर अवघ्या चार दिवसांत पाच अपघात; एक ठार, अनेकजण जखमी” या मथळ्याखाली दि. 22 डिसेंबर 2025 रोजी “तरुण भारत” दैनिकात बातमी प्रसिद्ध केली. याचाच परिणाम स्थानिक तरुणांनी बातमीची दखल घेत धोकादायक रस्ता असल्याचे दर्शविण्यासाठी लाल रंगाचे स्टिकर्स लावत पुढाकार घेतला. प्रशासनाने योग्य कार्यवाही नाही केल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचेही सांगितले. त्यानंतर दि. 26 डिसेंबर 2025 रोजी “तरुण भारतच्या बातमीची तरुणांनी घेतली दखल; प्रशासन जागे झाल्यास कायमस्वरूपी तोडगा निघणार!” अशी दुसऱ्यांदा बातमी तरुण भारतने प्रशासनाचा समाचार घेतला. तेव्हा झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाला अखेर जागे व्हावे लागले.
तरुण भारतने घेतलेल्या बातमीचा इम्पॅक्ट चांगलाच पडला. आज दि. 26 डिसेंबर 2025. (शुक्रवार) रोजी याठिकाणी थेट कामाला सुरुवात झाली. धोकादायक ठिकाणी दिशादर्शक फलक आणि सुचना फलक लावण्यात आले. यामुळे सामान्य जनतेत दैनिक तरुण भारतची विश्वासार्हता अधिक घट्ट झाले. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशात आनंदाचे वातावरण पसरले आहे. या मार्गाने रामपूर, कुशावाडी, होट्टल, काठेवाडी, शिवणी, देवापुर, येरगी, गवंडगाव, झरी मरखेल आणि माळेगांव (मक्ता) आदीं गावातील नागरिक, शाळकरी मुले प्रवास करीत असतात. तसेच होट्टल येथे चालुक्यकालीन मंदिरे असल्याने पर्यटक आणि भाविक भक्त येत असतात. त्यामुळे हा रस्ता चांगला अत्यंत आवश्यक होते. परंतु प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्याने अनेक अपघात घडले आहेत. होट्टल रस्त्यावरील अपघाताचे सत्र सुरू झाल्याने तरुण भारतने जनहितार्थ भूमिका मांडली यांचाच परिणाम रस्त्याचे काम चालू झाले. सुचना फलक आणि दिशादर्शक फलक लावण्यात आले. एकूणच या भागातील प्रवाशांची समस्या अखेरची मिटली.
चौकट
स्थानिक तरुणांचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न
होट्टल रस्त्यावर लिंगनकेरुर जवळील चढावाचा रस्ता अतिशय धोकादायक बनला असून येथे अपघातांची मालिका सुरू झाली होती. या अनुषंगाने आम्ही तरुण भारत दैनिकात बातमी प्रसिद्ध केली. या बातमीची दखल घेत परिसरातील शिवाजी सूर्यवंशी, राजूभाऊ दासरवाड, कैलास गाडीवान, ओमकार पाटील, गंगाधर पाटील, सतीश डांगे, गणेश पवार, बालाजी सूर्यवंशी आदी सजग तरुणांनी स्वखर्चातून तात्पुरते उपाय करण्यास सुरुवात केली आहे. धोकादायक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दगडांवर लाल रंगाचे स्टिकर्स लावून ‘धोका आहे’ अशी स्पष्ट निशाणी करण्यात आली आहे, जेणेकरून वाहनचालक सावध राहतील आणि पुढील अपघात टाळता येतील. या समस्येबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींना सर्व माहिती असूनही अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. “हा आमचा तात्पुरता आणि छोटासा प्रयत्न आहे. मात्र शासन-प्रशासनाने दखल नाही घेतल्यास आम्ही सर्व तरुण एकत्र येऊन रास्तारोको आंदोलन करु” अशी ठाम भूमिका या तरुणांनी घेतली होती.
तर प्रवाशांनाचे जीव वाचले असते
तरुण भारतच्या बातमीनंतर प्रशासन जागे होत कामाला सुरुवात केली. दिशादर्शक फलक आणि सुचना फलक लावले. परंतु अतिवृष्टीमुळे खचलेला रस्ता तेव्हाच दुरुस्त केला असता आणि दिशादर्शक फलक व सुचना फलक योग्य वेळी लावले असते तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचे जीव वाचले असते.
















