पंढरपूर – ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमातीर असे अभंगातून वर्णन असलेल्या चंद्रभागा नदीची अवस्था दिवसेंदिवस भयावह होत आहे. एकीकडे भाविक येथे आल्यावर याच चंद्रभागा नदीच्या पवित्र स्नानाचा आनंद लुटत असतात, ऐवढेच नाही तर गावाकडे परत जाताना हेच चंद्रभागेचे पवित्र जल तिर्थ म्हणून भाविक हौसेने नेत असतात. तर दुसरीकडे याच चंद्रभागा नदी पात्रात शहरातील ड्रेनेजचे मिसळणारे पाणी, सर्रास होणारे अस्थी विसर्जन, मृतदेहाला याच चंद्रभागेच्या पात्रातील पाण्यात स्नान घालणे, जनावरे धुणे असे सर्रास कार्यक्रम येथे सुरु असतात. या दूषित पाण्यामुळे भाविकांना वेगवेगळ्या साथीचे आजार केव्हाही उदभवु शकतात.
चंद्रभागा नदीचे प्रदूषण आणि स्वच्छते संदर्भात उच्च न्यायालयाच्या निर्देषांची अंमलबजावणी केवळ आषाढी,कार्तिकी सारख्या मोठ्या यात्रांच्या वेळीच प्रशासनाकडून केली जाते. मात्र इतर वेळचे काय ? असा सवाल सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
राज्यातील नव्हे तर देशातील प्रमुख तिर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरची ओळख आहे. या ठिकाणी श्री विठ्ठलाच्या दर्शनाच्या अगोदर चंद्रभागा स्नानाला महत्व आहे. चंद्रभागेचे स्नान झाल्यानंतर प्रत्येक भाविक या नदीचे जल तिर्थ म्हणून प्राशन करतो. गंगे समान असलेल्या चंद्रभागेचे तिर्थ अनेक भाविक आपल्या घरी देखील घेऊन जात असतात. मात्र अशा या चंद्रभागा नदीची अवस्था दिवसेंदिवस प्रशासनाच्या उदासीनतेने बकाल होवू लागल्याचे दिसत आहे.
या नदीच्या विविध घाटांवर प्रदूषण व् स्वच्छतेबाबत नुसत्या फलकांवर सूचना लिहून कर्तव्य बजाविण्या पलिकडे प्रशासनाकडून काहीही केले जात नाही. बऱ्याच वेळा शहरातील ड्रेनेजचे पाणी चक्क नदी पात्रात मिसळत असते. शहरातील गवळीं बांधवांकडून नदी पात्रातच आपली जनावरे स्वच्छ केली जातात. नदीच्या वाळवंटातच सर्रास दशक्रिया विधी सुरु असल्याचे दिसते. मयत झालेल्या व्यक्तींचा मृतदेह चक्क नदी पात्रात बुडवून शेवटचे पवित्र स्नान घालण्याची परंपरा पाळल्याचे समाधान देखील शहरातील नागरिकांकडून आजही पार पाडले जात आहे. घरातील देवदेवतांच्या पुजेतून साठलेले निर्माल्य देखील सर्रास नदीपात्रातच टाकले जात आहे.
या बरोबरच महिला वर्गाचे पात्रातील पाण्यात मनसोक्त कपडे धुणे, नदीच्या वाळवंटात अस्ताव्यस्त पसरलेल्या कपड्यांच्या चिंध्या, प्लाँस्टिकचे द्रोण,पत्रावळी, नारळाची केसरे, फुलांचे सुकलेले हार, देवदेवतांच्या दुभंगलेल्या मुर्तीचे ढिगारे पालिका केव्हा स्वच्छ करणार. गाढवा वरुन रात्री,अपरात्री नदी पात्रातील वाळू मुळे पात्राची होणारी चाळण महसूल खाते केव्हा थांबविणार असे चंद्रभागा नदीच्या पावित्र्य, प्रदूषण तसेच स्वच्छते संदर्भातील एक ना अनेक सवाल शहरातील सुज्ञ नागरिक, वारकरी भाविक तसेच महाराज मंडळींकडून उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे प्रशासनाकडून मात्र कार्यवाही मात्र शुन्य आहे.

















