पूणे – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकार ने संकटग्रस्त बळीराजाच्या स्थितीवर चर्चा करीत मदतीचा हात पुढे करावा,अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी रविवारी (ता.७) केली. चहापानावर विरोधकांचा बहिष्कार योग्य नाही. विधिमंडळात चर्चेतून मार्ग निघतो; विरोधी पक्षांनी सरकार सोबत सर्व मुद्यावर चर्चा करावी,असे आवाहन देखील पाटील यांनी केले.
सोमवार पासून नागपूर येथे सुरु होणाऱ्या अधिवेशनात सरकार ने पुण्यातील महार वतन जमीन घोटाळा प्रकरण आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांच्या सिडको जमीन घोटाळा प्रकरणी निवेदन सादर करण्याची मागणी देखील पाटील यांनी केली.
आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरकारच्या मित्र पक्षातील नेत्यांची प्रकरणे बाहेर काढून अडचणीत आणण्याचा विरोधकांनाचा डाव आहे. मात्र, फडणवीस विरोधकांच्या मुद्द्यावर निवेदन करीत; योग्य निर्णय घेऊन सरकारची बाजू सांभाळून घेतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे.त्यांच्या स्थितीकडे सरकार ने लक्ष देत, संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला, तर सरकार वरील सर्वसामान्यांचा विश्वास आणखी बळावेल, असे पाटील म्हणाले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच दोन्ही सभागृहात अधिकृत विरोधी पक्ष नेता नाही, अशात सरकारने विरोधकांच्या मुद्द्यांना बगल न देता सभागृहाचे कामकाज चालवावे, असे पाटील म्हणाले.


















