पंढरपूर – सध्या नाताळाच्या सुट्या आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पंढरपूरात धार्मिक पर्यटनासाठी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे. या मध्येच येथील भिक्षेकरी मंडळीं देखील हायटेक झाली असून भिक्षा किंवा भिक मागण्यांचे त्यांनी देखील नवनवे फंडे शोधलेले दिसत आहेत.
पंढरपूर हे राज्यातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी दररोज हजारोच्या संख्येने भाविक विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात. वर्षभरात आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघी या चार प्रमुख यात्रा या ठिकाणी भरत असतात. त्याच प्रमाणे गेल्या आठ ते दहा वर्षापासून नववर्षे स्वागत, शनिवार, रविवार तसेच इतर लागुन सुट्या आल्यावर तसेच प्रत्येक महिन्याच्या एकादशीला येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. या शिवाय दररोज या ठिकाणी कमीत कमी पन्नास ते साठ हजार भाविकांची मांदियाळी दिसुन येते. सहाजिकच त्यामुळेच इतर देशातील इतर तिर्थक्षेत्रां प्रमाणेच येथे देखील भिक्षेकरी मंडळींची संख्या मोठी दिसत आहे. येथील भिक्षेकरी मंडळी देखील हायटेक झालेली आहेत. त्यांनी देखील भिक मागण्याचे नवनवे फंडे शोधलेले आहेत.
येथील चंद्रभागेचे वाळवंट, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात तसेच शहरातील प्रदक्षिणा मार्ग,कैकाडी महाराज मठ, गजानन महाराज मठ आदी मोठे मठ,धर्मशाळांच्या परिसरात भिक्षेकऱ्यांची वर्दळ दिसून येते. येथील चंद्रभागा नदीच्या वाळवंटात काही भिक्षेकरी आपल्या बिऱ्हाडासह वास्तव्यास दिसतात.येथे वास्तव्यास असणारे अनेक भिक्षेकरी व्याजाने देखील पैसे देत असल्याचे येथील चंद्रभागा नदीच्या परिसरातील व्यवसायीक मंडळी तसेच वास्तव्यास असलेल्या सर्वसामान्य नागरिकांकडून आवर्जून सांगितले जाते.
येथील अनेक भिक्षेकरी मंडळींकडून सुट्या पैशाचे देखील व्यवहार केले जातात. विशेषत: यात्रांच्या काळात स्थानिक व्यापारी सुट्या पैशांची अडचण असताना अव्वाच्या सव्वा दराने बंद्दे पैसे घेऊन सुट्टे पैसे देतात. या बरोबरच तांबे,पितळेच्या जुन्या तसेच दुर्मिळ नाण्यांचा व्यवसाय करुन अव्वाच्या सव्वा पैसे मिळवितात. अनेक भिक्षेकरी नागरिकांकडून सुट्या पैशांचे झंझट नको म्हणून खास स्कँनरची देखील व्यवस्था करण्यात आल्याचे दिसत आहे.
—————————
भिक्षामागण्या बरोबरच इतर देखील व्यवसाय
येथील चंद्रभागेच्या वाळवंटातील भिक्षेकरी भिक्षा मागण्या बरोबरच चंद्रभागा नदीच्या ओटीचे साहित्य अर्थात खण,नारळ तसेच चंद्रभागेत दिपदान करण्यासाठी लागणारे द्रोण,दिवे आदी प्रासादिक साहित्य विक्रीचे तसेच रांगोळींचे छाप आदी व्यवसाय देखील करीत असल्याचे सांगितले जाते. दररोज सकाळच्या वेळी गर्दी असताना हे व्यवसाय करता यावेत यासाठी भिक्षेकरी मंडळी नदीच्या घाटांवरील प्रत्येक पायरींवर ( ज्या, त्या भिक्षेकऱ्यांच्या ज्या, त्या पायऱ्या ठरलेल्या ) आपली टोपली, परडी आणि त्या मध्ये देवतांच्या मुर्ती ठेवून आपले इतर व्यवसाय सांभाळत असतात. येथे येणारे भाविक चंद्रभागेच्या स्नानासाठी जाताना किंवा स्नान करुन परत येताना त्यांनी ठेवलेल्या दुरडी,टोपल्यांमधून सुट्या किंवा बंद्या (नोटा ) पैशाची भिक्षा टाकीत पुण्याचे काम मानून चंद्रभागा स्नान,पुंडलिक दर्शनाचे पुण्य पदरात पाडून घेतल्याचे समाधान मानतात. इकडे भिक्षेकरी मात्र बिनभांडवलाचा एकापेक्षा एक फंडे वापरुन आपल्या भिक्षा मागण्याच्या व्यवसायात गब्बर होतात.


























