करमाळा – तालुक्यातील कोर्टी गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सवितादेवी राजेभोसले (वहिनीसाहेब) यांच्याबाबत “संधीसाधू” असा शब्दप्रयोग करणाऱ्यांनी आधी स्वतःची भूमिका तपासावी, असा थेट सवाल केतुर येथील उदयसिंह पाटील यांनी केला आहे.
करमाळा तालुक्याचे आमदार श्री. नारायण आबा पाटील यांचे मीडिया प्रमुख संजय फरतडे यांनी वहिनीसाहेबांवर केलेले वक्तव्य चुकीचे व अन्यायकारक असल्याचे उदयसिंह पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत वहिनीसाहेबांच्या पाठिंब्यावर कोणी-कोणी कधी संधी साधली, हे सर्वांनाच माहिती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सवितादेवी राजेभोसले या कर्तृत्ववान व प्रभावी महिला नेत्या असून, त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी पश्चिम भागातील त्यांची स्वतंत्र ताकद सर्वश्रुत आहे. राजकारणातील घडामोडींमध्ये ज्यांना त्यांनी मोठे केले, त्यांच्याकडूनच त्यांना दगाफटका व गद्दारी सहन करावी लागल्याचे चित्र आहे, असेही पाटील म्हणाले.
कोर्टी जिल्हा परिषद गटाची निवडणूक एकतर्फी झालेली असून सर्व उमेदवार बहुसंख्य मतांनी निवडून येणार आहेत. त्यामुळेच वैफल्यग्रस्त मानसिकतेतून काहींनी वहीनीसाहेबांबाबत बेताल वक्तव्ये केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
वहीनीसाहेबांवर टीका करण्याआधी “संधीसाधू” नेमका कोण आहे आणि वहीनीसाहेबांच्या पाठिंब्यावर कोणी कशी संधी साधली, याचा आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन उदयसिंह पाटील यांनी केले आहे.
















