सोलापूर – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह शंभर अधिकारी जिल्ह्यातील विविध गावात आज बुधवारी १५ आॅक्टोबर रोजी मुक्काम करणार आहेत. तसेच दुसर्या दिवशी प्रभातफेरी, महाश्रमदान करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची जनजागृती करणार आहेत.
ग्रामीण भागातील पंचायतराज संस्था अधिक सक्षम, स्वयंपूर्ण आणि जनसहभागी बनविण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचा प्रथम क्रमांक यावा, या उद्देशाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी काम सुरू केले आहे.
बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम, सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय सर्व विभागप्रमुख जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतींमध्ये मुक्काम करणार आहेत. तसेच या मुक्कामादरम्यान ग्रामविकासाचे प्रश्न, स्थानिक गरजा आणि ग्रामपंचायतींच्या कार्याचा प्रत्यक्षात आढावा घेणार आहेत.
चौकट
गावाची होणार साफसफाई
गुरुवार १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी सात ते दहा या वेळेत मुक्कामी राहिलेले सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने गावात महाश्रमदान विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. या श्रमदानाद्वारे गावात स्वच्छता, वृक्षसंवर्धन, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करण्यात येणार आहे.