नागपूर, 20 नोव्हेंबर (हिं.स.) : लोकशाहीत मतदानाचे महत्त्व अनन्यसाधारण असून मतदान करणे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. मध्य-नागपूर मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर ते बोलत होते.
राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी आज, बुधवारी मतदान झाले. संघ मुख्यालयाचा परिसर मध्य-नागपूर मतदारसंघात येतो. याठिकाणी भाजपचे प्रवीण दटके आणि कांग्रेसचे बंटी शेळके यांच्यात प्रमुख लढत आहे. सरसंघचालकांनी सकाळी 7 वाजता स्थानिक भाऊजी दप्तरी शाळेतील मतदान केंद्रात जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर संवाद साधताना सरसंघचालक म्हणाले की, मी पूर्वनियोजीत कार्यक्रमानुसार उत्तराखंडच्या दौऱ्यावर होता.
परंतु, मतदानासाठी मी माझा कार्यक्रम एक दिवस आधीच आटोपता घेतला. तसेच मंगळवारी रात्री नागपूरला पोहचलो. आता मतदान केल्यानंतर पुन्हा प्रवासाला जाणार आहे. लोकशाहीत मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकानेच मतदान करायला हवे असे आवाहन सरसंघचालकांनी केले. यावेळी सरसंघचालकांसोबतच संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश उपाख्य भय्याजी जोशी, अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, अखिल भारतीय संपर्क प्रमुख सुनील देशपांडे आणि संघाच्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.