सोलापूर -वालचंद शिक्षण समूहांतर्गत वालचंद महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित करण्यात आलेला ‘युथ वेलनेस रिट्रीट २०२६’ हा अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम उत्साहात संपन्न झाला.
परमपूज्य मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराज यांच्या मंगल मार्गदर्शनाखाली सुमारे २५०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा समतोल साधणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी परमपूज्य आचार्य श्री विद्यासागर महाराज यांच्या प्रेरणादायी विचारांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉ. रणजित गांधी, भूषण शहा, पराग शहा तसेच सर्व प्राचार्यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
डब्ल्यू.आय.टी.चे माजी विद्यार्थी वैभव परतवार, पूजा परतवार आणि अंकित जैन यांच्या सहकार्याने कार्यक्रमाची सुरुवात ऊर्जावान झुंबा नृत्याने झाली. त्यानंतर योग व ध्यान सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या रिट्रीटमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य जागृत झाले असून शैक्षणिक प्रगतीसोबतच जीवनमूल्यांची जाणीव अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. अध्यात्म, विज्ञान आणि आधुनिक जीवनशैली यांचा समतोल साधणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. मानसिक सशक्तता, आत्मजागरूकता आणि अंतर्मुख साधनेचा संदेश देणारा हा उपक्रम जैन धर्माच्या तत्त्वज्ञानाशी सुसंगत असा जीवनदृष्टिकोन रुजविणारा ठरला.
























