समाजात सत्य विचार रुजवण्यासाठी शस्त्र नव्हे, तर लेखणी हेच प्रभावी शस्त्र आहे. त्यामध्ये असलेल्या सृष्ट विचारांमध्ये दुष्ट विचारांना नष्ट करण्याचे सामर्थ्य असते. लेखणीच्या माध्यमातून मानवाच्या बुद्धीमध्ये चांगल्या विचारांचे रोपन करायचे आणि ते अंत:करणामध्ये पाझरत जाईल, याची काळजी घ्यायची. साधारणपणे कोणतेही नियतकालिक चित्रपटांविषयीची माहिती, ललित लेख अशा विशिष्ट विषयाला वाहिलेले असते; मात्र ‘सनातन प्रभात’च्या वैशिष्ट्यपूर्ण वार्तांकनात मनोरंजनाला प्राधान्य न देता शास्त्र, नैतिकता, धर्म, न्याय, राष्ट्रशिक्षण, सण, उत्सव यांविषयी प्रबोधन केले जाते. साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ मागील अडीच दशके समाज घडवण्याचे उल्लेखनीय कार्य करत आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांनी केले.
माटुंगा (प.) येथील लक्ष्मीनारायण बाग सभागृह येथे शनिवारी ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिन सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सनातन संस्थेच्या प्रवक्त्या नयना भगत आणि सनातन प्रभातच्या उपसंपादिका रुपाली वर्तक या वक्त्यांनी सुद्धा यावेळी संबोधित केले. सनातन प्रभातच्या युट्यूब वाहिनीवरून या सोहळ्याचे ‘लाईव्ह प्रसारण’ करण्यात आले.
या कार्यक्रमाचा प्रारंभ वेदमंत्रपठण आणि सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक (सुश्री) सद्गुरू अनुराधा वाडेकर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाला. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनाच्या अंकाचे प्रकाशन वक्त्यांच्या शुभहस्ते यावेळी करण्यात आले. ‘सनातन प्रभात’ची वैशिष्टये सांगणारा विडिओ यावेळी दाखवण्यात आला. सनातन प्रभातचे मुंबई येथील प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. ‘सनातन प्रभात’च्या काही वाचकांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. ‘सनातन प्रभात’ कक्ष, विविध विषयांवरील ग्रंथप्रदर्शन, राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही याचा उपस्थितांनी लाभ घेतला.
राष्ट्र आणि धर्म यांचे पुनरुत्थानासाठी वैचारिक बैठक सिद्ध करणे हाच ‘सनातन प्रभात’चा केंद्रबिंदू – रुपाली वर्तक, उपसंपादिका, ‘सनातन प्रभात’
आजपासून 25 वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ असा शब्द उच्चारणे, हा जणू अघोषित गुन्हा होता. अशा काळात ‘ईश्वरी राज्य’, ‘हिंदु राष्ट्र’, हे शब्द जर समाजात खर्या अर्थाने कुणी रूढ केले असतील, तर ते ‘सनातन प्रभात’ने ! समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रत्येक अंगाचे आदर्श व्यवस्थापन हिंदु राष्ट्रात अपेक्षित आहे. राष्ट्र आणि धर्म यांच्या प्रत्येक अंगाचे संरक्षण आणि नंतर त्यांचे पुनरुत्थान करण्यासाठी वैचारिक बैठक सिद्ध करणे हा सनातन प्रभातचा केंद्रबिंदू आहे. ‘साप्ताहिक सनातन प्रभात’च्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यानिमित्त सनातन प्रभातचे वाचक, वितरक, हितचिंतक, विज्ञापनदाते, हिंदुत्वनिष्ठ आदी सर्वांप्रती कृतज्ञताभावाने आम्ही आभार व्यक्त करतो.
वाचकांचे प्रबोधन करण्यात ‘सनातन प्रभात’चे मोलाचे योगदान ! – नयना भगत, प्रवक्ता, सनातन संस्था
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून अत्याचारी इंग्रज सरकारवर आसूड ओढले होते. आताच्या काळात हिंदु राष्ट्राच्या चळवळीत ‘सनातन प्रभात’ची भूमिकाही ‘केसरी’प्रमाणे म्हणजे एखाद्या सिंहाप्रमाणेच आहे. ‘हिंदु राष्ट्रा’चा विचार जनसामान्यांपर्यंत पोहचवण्यामध्ये ‘सनातन प्रभात’चे विशेष योगदान आहे. ‘साधना’ हा मानवी आयुष्याचा महत्त्वाचा पैलू असून साधना कृतीत आणण्यासाठी करायचे प्रयत्न यासाठी वाचकांना ‘धर्मबोध’ करून देणे तसेच राष्ट्र आणि धर्मजागृतीविषयी वाचकांचे प्रबोधन करण्यात ‘सनातन प्रभात’चे मोलाचे योगदान आहे.