भारताने ज्या दिवशी चंद्रावर झेंडा फडकवला, तो दिवस म्हणजेच २३ ऑगस्ट यापुढे ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा करण्यात येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. इस्रोच्या मुख्यालयात चांद्रयान-३ मोहिमेतील सहभागी शास्त्रज्ञांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
तरुण पिढी सायन्स, स्पेस आणि इनोवेशनबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक!
पंतप्रधान पुढे म्हणाले की, तुम्ही केलेल्या कामाची माहिती देशवासियांना मिळाली पाहिजे. हा प्रवास सोपा नव्हता. मून लँडरचं सॉफ्ट लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी शास्त्रज्ञांनी आर्टिफिशियल देखील बनवले. विक्रम लँडर उतरवून त्याची चाचणी घेण्यात आली. इतक्या परीक्षा देऊन मून लँडर तिथे सुखरूप पोहोचले, त्यामुळे त्याला यश मिळणार हे निश्चित होतं. आज जेव्हा मी पाहतो की, भारतातील तरुण पिढी सायन्स, स्पेस आणि इनोवेशन या संदर्भात जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, त्यामागे हेच यश आहे.
हा दिवस आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील!
मंगळयान आणि चांद्रयान यांचे यश, तसेच गगनयानच्या तयारीने देशाला एक नवं चैतन्य दिलं आहे. आज भारतातील थोरामोठ्यांच्या तोंडी चांद्रयानाचं नाव आहे. भारतातील लहान मूलही आपल्या वैज्ञानिकांमध्ये भविष्य पाहत आहे. संपूर्ण भारताच्या पिढीला तुम्ही जागृत करून ऊर्जा दिली, हेही तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही तुमच्या यशाची खोल छाप सोडली आहे. आजपासून रात्रीच्या वेळी चंद्र पाहणाऱ्या कोणत्याही लहान मुलाला विश्वास बसेल की, माझा देश जसा चंद्रावर पोहोचला आहे. तेवढीच हिंमत आणि चैतन्य त्या मुलामध्येही आहे. मुलांमध्ये स्वप्नांची बीजं तुम्ही पेरली आहेत. ती वटवृक्ष बनतील आणि विकसित भारताचा पाया बनतील. तरुण पिढीला सतत प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २३ ऑगस्ट रोजी भारताने चंद्रावर तिरंगा फडकावला, तो दिवस भारत ‘राष्ट्रीय अंतराळ दिवस’ म्हणून साजरा करेल. हा दिवस आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील.