मंगळवेढा : जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी उसाच्या पहिल्या हप्त्याचा दर ३ हजार रुपये जाहीर केला असताना मंगळवेढा तालुक्यातील एकाही कारखान्याने दर जाहीर न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. अखेर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत युटोपीयन शुगर कारखान्याने पुढाकार घेत उसाच्या पहिल्या हप्त्याचा दर ३ हजार रुपये जाहीर करून ऊस दराची कोंडी फोडली आहे.
ऊस दरासाठी मंगळवारी आंदोलनासाठी गेलेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हाती युटोपीयन शुगर कारखाना प्रशासनाने पहिला हप्ता ३ हजार रुपये देण्याचा निर्णय लेखी पत्राद्वारे सुपूर्त केला. हे पत्र हाती पडताच अवघ्या एका तासात भैरवनाथ शुगर कारखान्यानेही उसाला ३ हजार रुपये दर देण्याबाबतचे लेखी पत्र शेतकरी संघटनेकडे दिले. त्यामुळे शेतकरी आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात उसाच्या पहिल्या हप्त्यासाठी आंदोलनाचा भडका उडाला असून सर्व शेतकरी संघटनांनी एकजूट करत ‘आरपार’ची लढाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील कारखानदारांनी आपापसातील राजकीय मतभेद विसरून सगळ्यांनी एकच दर जाहीर करण्याची ‘गठ्ठी’ केल्याचा आरोप शेतकरी संघटनांकडून करण्यात येत होता. हा डाव ओळखून स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आक्रमक आंदोलन छेडले.
लोकशाही मार्गाने मात्र आक्रमक स्वरूपात आंदोलन सुरू झाल्याने नाईलाजाने कारखानदारांना दराबाबत निर्णय घ्यावा लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शेतकरी संघटनांनी आंदोलनाचे स्वरूप बदलत केवळ निवेदन देण्याऐवजी थेट गव्हाणीत बसून कारखाना बंद पाडण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांत आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले आहे. लोकमंगल कारखान्यावर गेल्या दोन दिवसांपासून जनहित शेतकरी संघटनेचेही आक्रमक आंदोलन सुरू आहे.
रासायनिक खतांचे वाढते दर, मजुरीचा खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी ऊस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहे. त्यामुळे आंदोलनाची धार दिवसेंदिवस वाढत असून कारखानदारांना निर्णय घेणे भाग पडत आहे.
तालुक्यातील प्रत्येक कारखानदार ‘इतर कारखानदार जो दर जाहीर करेल, तोच दर आम्ही देऊ,’ अशी भूमिका शेतकरी संघटना पदाधिकाऱ्यांसमोर मांडत होते. मात्र युटोपीयन शुगर कारखान्याने पहिला हप्ता ३ हजार रुपये देण्याचा निर्णय लेखी जाहीर करत हा पेच सोडवला आहे. त्यामुळे आता आवताडे शुगर , दामाजी शुगर तसेच तालुक्यालगतचा जकराया शुगर हे तीन हजार रुपये जाहीर करणार की स्पर्धेत यापेक्षा अधिक दर देतील, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.युटोपीयन शुगर कारखान्यावर पहिला हप्ता ३ हजार रुपयांचे पत्र स्वीकारताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक युवराज घुले, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, स्वाभिमानीचे बाहुबली सावळे, अनिल बिराजदार, संतोष सोनगे, बाळासाहेब जगदाळे, गणेश लामकाने, निवास नागणे, राजेंद्र पवार, किशोर दत्तू यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.
“युटोपीयन शुगर कारखान्याने उसाच्या पहिल्या हप्त्याचा दर ३ हजार रुपये जाहीर करून शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि भावनांचा सन्मान केला आहे. हा निर्णय आम्ही पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने घेतला आहे. मात्र हा केवळ सुरुवात असून तो इतर सर्व साखर कारखान्यांसाठी दिशादर्शक ठरावा. आवताडे, भैरवनाथ, दामाजी, जकाराया तसेच जिल्ह्यातील इतर कारखान्यांनीही कोणताही विलंब न करता शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून किमान याच पातळीवर, किंबहुना त्यापेक्षा जास्त दर जाहीर करावा. शेतकरी आज आर्थिक संकटात सापडलेला असून कारखानदारांनी एकजुटीने दर दाबण्याऐवजी शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी. अन्यथा शेतकऱ्यांचे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आम्ही याच ठिकाणी देत आहोत.”
— युवराज घुले, जिल्हा संघटक, स्वाभिमानी शेतकरी संघटना
फोटो ओळ :
युटोपीयन शुगर कारखान्याने पहिला हप्ता ३ हजार रुपये जाहीर केल्याचे लेखी पत्र शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना देताना कारखाना प्रशासन दिसत आहे.
छाया विजय भगरे मंगळवेढा.

















