वाळूज – लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती प्रत्येक निवडणुकीत भाषणांच्या सर्वोच्च स्थानी असलेला मुद्दा म्हणजे सीना–भोगावती नदीजोड कालवा. गेली तब्बल ३० वर्षे नरखेड पंचक्रोशीत या विषयावर सभेत जोरदार भाषणं होतात, आश्वासनांची सरबत्ती होते; मात्र मतदान संपताच हा विषय पुन्हा फाईलमध्ये गाडला जातो. गेल्या तीन दशकांचा अनुभव सांगतो की या प्रश्नावर कृतीपेक्षा आश्वासनांनाच अधिक पाणी घातले गेले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, माढा व बार्शी तालुक्यांतून वाहणारी भोगावती नदी आणि तिच्या काठावरील परिसर हा अवर्षणप्रवण आहे. येथील जमीन काळी, कसदार आणि उच्च प्रतीची असतानाही शेतकरी पाण्यापासून कायम वंचित राहिला आहे. पावसाळ्यात कधीतरी वर्षातून एकदा भोगावती भरून वाहते; मात्र उर्वरित वर्षभर ती तहानलेलीच असते. परिणामी हा परिसर वर्षानुवर्षे दुष्काळाच्या छायेत अडकून राहिला आहे.
भोगावती नदीकाठावरील माढा तालुक्यातील अंजनगाव, सुर्डी, उंडेगाव; बार्शी तालुक्यातील काळेगाव, इर्ले, ढोराळे, यावली, तडवळे, वैराग, मुंगशी (वा); मोहोळ तालुक्यातील मनगोळी, वाळूज (दे), भैरववाडी, देगाव (वा), नरखेड, मसलेचौधरी, डिकसळ, भोयरे, हिंगणी (नि.); तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील साखरेवाडी, कळमण, भागाईवाडी आदी अनेक गावे या पाण्याअभावी त्रस्त आहेत.
दुसरीकडे उजनी धरण भरल्यावर भीमा व सीना नदीतून अतिरिक्त पाणी सोडावे लागते, ज्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन नुकसान होते. हेच वाहून जाणारे अतिरिक्त पाणी जर सीना–भोगावती जोड कालव्याच्या माध्यमातून वापरले, तर संपूर्ण परिसराचे चित्र बदलू शकते. प्रश्न असा की हे वाहून जाणारे पाणी उपयोगात आणण्याची दूरदृष्टी का दाखवली जात नाही ? सीना–भोगावती नदीजोड कालव्याचा प्रस्ताव यावर ठोस उत्तर देतो.
या प्रस्तावानुसार, सीना नदीवरील रिधोरे (ता. माढा) येथील बंधाऱ्यातून कालवा व बोगद्याच्या माध्यमातून पाणी इर्ले (ता. बार्शी) येथे भोगावती नदीत सोडण्यात येईल. पुढे भोगावती नदीतून भोयरे (ता. मोहोळ) बंधाऱ्यातून नान्नज मार्गे एकरुख तलाव (सोलापूर) येथे पाणी नेण्याचा सुमारे ५५ किमीचा प्रस्ताव आहे. यामुळे भोगावती नदीअंतर्गत ५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, उजनी धरणातून भीमा–सीना जोड कालव्याद्वारे ज्या पद्धतीने गुरुत्वाकर्षणाने पाणी आणले जाते, त्याच धर्तीवर सीनेतून भोगावतीत पाणी नेणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. सीना नदीची तळपातळी १५७५ फूट, तर भोगावती नदीची तळपातळी १५४० फूट आहे. जवळपास ३५ फूट नैसर्गिक उतार आणि केवळ २३ किमी अंतर असल्याने कमी खर्चात, कायमस्वरूपी पाणीपुरवठा शक्य आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. ही योजना तांत्रिकदृष्ट्या शक्य, आर्थिकदृष्ट्या परवडणारी आणि पर्यावरणदृष्ट्या कमी नुकसान करणारी आहे.
या प्रश्नासाठी सन २००६ मध्ये चार तालुक्यांतील शेतकऱ्यांनी ‘पाणीसंघर्ष समिती’ स्थापन केली. या समितीचे संस्थापक अध्यक्ष वाळूजचे कै. सुशांत कादे होते.(मा. सभापती आरोग्य व शिक्षण समिती, जि. प सोलापूर ) प्रशासकीय सर्वेक्षणे, राजकीय गाठीभेटी, संबंधित मंत्र्यांसोबत बैठका—शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटू शकतो, यासाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांपर्यंतही हा विषय पोहोचवण्यात आला होता आणि त्यावेळी सकारात्मक प्रतिसादही मिळाला होता. सध्या या समितीचे अध्यक्षपद डॉ. संदेश कादे यांच्याकडे असून तेही सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांत फक्त राजकीय आश्वासनं मिळाली, प्रत्यक्षात शासनपातळीवर ठोस कृती झाली नाही. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे हा प्रकल्प आजही प्रलंबित आहे.
विशेष म्हणजे, हा प्रकल्प नदीजोड योजनेच्या धोरणात बसणारा, कमी खर्चात जास्त लाभ देणारा आणि विद्यमान शासनाच्या जाहीर भूमिकेशी सुसंगत आहे. सीना–भोगावती जोड कालवा हा त्याचा आदर्श नमुना ठरू शकतो. कमी खर्च, जास्त लाभ आणि पूरनियंत्रण—तीन उद्दिष्टे एकाच प्रकल्पातून साध्य होतात तरीही प्रश्न सुटत नाही, ही खेदाची बाब आहे. नरखेड गटातील शेतकरी व मतदारांची ठाम मागणी आहे की शासनाने या जोड कालव्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.
दर पंचवार्षिक निवडणुकीत हा मुद्दा कळीचा ठरतो. प्रचारसभा या विषयाशिवाय होत नाहीत—सत्ताधारी असोत वा विरोधक. पण २०–३० वर्षांत प्रश्न सुटत नाही, हीच शोकांतिका आहे. गरज आहे राजकीय इच्छाशक्तीची आणि सर्वपक्षीय ऐक्याची. अनिश्चित पावसमान, सततची निसर्गाची अवकृपा, घटते शेतीउत्पन्न आज शेती असूनही परवडत नाही. अशा वेळी सीना–भोगावती नदीजोड कालवा हा केवळ विकास प्रकल्प नसून शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न आहे.
हा प्रश्न सुटेल की नाही, की नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा भाषणं आणि आश्वासनंच राहतील—हे येणारा काळच ठरवेल.
बॉक्स हायलाइट (Fact Box)-
सीना–भोगावती नदीजोड कालवा :
• प्रस्तावित कालवा : सीना–भोगावती नदीजोड
• प्रमुख स्रोत : सीना नदी – रिधोरे बंधारा (ता. माढा)
• अंतिम टप्पा : भोगावती नदी –इर्ले बंधारा (ता. बार्शी)
• एकूण अंतर : सुमारे २३ कि.मी. (सीना–भोगावती)
• एकूण प्रस्ताव लांबी : अंदाजे ५५ कि.मी.
• बोगद्याची लांबी : १२.५० कि.मी.
• कालव्याची लांबी : ११.५० कि.मी.
• सीना नदी तळपातळी : १५७५ फूट
•भोगावती नदी तळपातळी : १५४० फूट
• नैसर्गिक उतार : सुमारे ३५ फूट (गुरुत्वाकर्षणावर आधारित प्रवाह)
• प्रस्तावित लाभ क्षेत्र : सुमारे ४०,००० हेक्टर
• लाभार्थी तालुके : मोहोळ, माढा, बार्शी, उत्तर सोलापूर
• भरून येणारे बंधारे : ५ (कोल्हापूर पद्धतीचे )
•पाणीपुरवठा: १०० गावे
• प्रकल्पाचे फायदे :
– पूरस्थितीत वाहून जाणाऱ्या पाण्याचा उपयोग
– दुष्काळग्रस्त भागाला कायमस्वरूपी पाणी
– कमी खर्चात जास्त लाभ
– शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली
• प्रलंबित कालावधी : सुमारे ३० वर्षे
• मुळ अडथळा : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व प्रशासकीय विलंब
















