सोलापूर : सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून या काळात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास पाळतात. सायंकाळी इफ्तारच्या वेळी तसेच रात्री उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढत असल्याने सोलापूर शहरातील सर्व दुकाने, स्टॉल्स, हॉटेल्स व इतर व्यावसायिक आस्थापनांना रमजान महिन्याच्या कालावधीत रात्री १ वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
इफ्तारच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्यामुळे त्या वेळेत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी तसेच शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक ती सवलत व सहकार्य करावे. तसेच इफ्तार आणि सायंकाळच्या नमाजवेळी नागरिकांना सूचना देण्यासाठी मशिदींमधून किंवा निश्चित ठिकाणी केवळ दहा मिनिटांसाठी लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
रमजान महिन्यातील धार्मिक भावना, वाढती गर्दी आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.
यावेळी नगरसेवक तौफिक हत्तुरे, वाहेदा शेख, अनिसा मोगल, अखिला भागनगरी, आसिफ शेख, नय्युम सालार, बाबा सालार, शोएब चौधरी आदि उपस्थित होते

























