पंढरपूर – येथील चंद्रभागेच्या वाळवंटात वाळू चोरी रोखण्यासाठीचा जालीम उपाय म्हणून प्रशासनाकडून लाखो रुपये खर्चुन सीसीटिव्ही कँमेरे बसविण्यात आलेले आहेत. मात्र येथील सीसीटिव्ही कँमेऱ्यांची अवस्था बघितली तर ते कार्यान्वीत आहेत की बंद अवस्थेत असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित झाल्या शिवाय रहात नाही. कारण जर कँमेरे चालू स्थितीत असतील तर गाढवावरुन होणारी वाळू चोरी बंद का होत नाही असा संतप्त सवाल पंढरपूरवासियांकडून उपस्थित केला जात आहे.
पंढरपूर हे राज्यातीलच नव्हे तर देशातील एक प्रमुख तिर्थक्षेत्र आहे. येथील विठ्ठलाच्या दर्शनाला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व चंद्रभागा स्नानाला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे आलेले प्रत्येक भाविक दर्शना अगोदर चंद्रभागेच्या वाळवंटात स्नानासाठी जात असतो. जरी त्याने स्नान केले नाही तरी तो हातपाय धुवून चंद्रभागेचे तिर्थप्राशन करुन मगच विठुरायाच्या दर्शनासाठी येथील मंदिरात जात असतो.
चंद्रभागेच्या विस्तीर्ण वाळवंटाची गेल्या दहा, बारा वर्षापासून अवस्था अत्यंत बकाल झालेली दिसत आहे. वाळवंट बकाल होण्याचे प्रमुख कारण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातून होणारी वाळू चोरी, पंढरपूर शहरात गाढवावरुन शेकडो ब्रास वाळू चोरी दररोज होते आहे. मात्र ही वाळू चोरी प्रशासनाला प्रशासनातील काही आधिकाऱ्यांची वाळू माफियां बरोबर असलेल्या अर्थपुर्ण मैत्रीमुळे अद्यापही रोखता आलेली नाही. मध्यंतरीच्या काळात वाळू चोरी रोखण्यासाठी वाळवंटा मध्ये सीसीटिव्ही कँमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले. ते उभारत असताना त्या मध्ये काही फिरते कँमेरे देखील लावण्यात आले. जेणे करुन वाळवंटातील दूरवर देखील कँमेऱ्याची नजर राहून होणाऱ्या वाळूचोरीला कुठेतरी आळा बसु शकेल.
दरम्यान वाळवंटात आज पाहिले तर नदी पात्रा शिवाय इतर ठिकाणी वाळू कुठेही दिसत नाही. पूर्वी वाळवंटातून जाताना सर्वसामान्य माणासाला वाळुतून चालणे कठीण होत असे. नगरप्रदक्षिणा करणार्यांना वाळूतून पायी चालत असताना अक्षरश: दम लागत असे. मात्र वाळवंटात आज मितीला वाळू कुठेच दिसत नाही. अगदी वाळू खरडून काढल्यामुळे वाळवंटातील वाळूच्या खाली असलेले मातीचे साम्राज्य सर्वत्र दिसत आहे.
जर वाळू चोरी रोखण्यासाठी हे सीसीटिव्ही कँमेरे बसविले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असेल तर अद्याप पर्यंत वाळवंटातील ऐवढी वाळू चोरी झालीच कशी ?, दिवसाढवळ्या सुरु असलेली वाळू चोरी अर्थपूर्ण मैत्रीमुळेच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडत नसेल मात्र सीसीटिव्ही यंत्रणाव्दारे तरी ती उघड का होत नाही ? असे एक ना अनेक सवाल पंढरपूरवासियांकडून उपस्थित केले जात आहेत.
——————-
मध्यंतरीच्या काळात चंद्रभागेच्या वाळवंटातील वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडून जे सीसीटिव्ही कँमेरे बसविण्यात आले त्यांची क्वाँलिटी अतिशय उत्तम अल्याचे सांगितले गेले. कारण वाळवंटाचे विस्तीर्ण क्षेत्र कँमेऱ्यात टिपता यावेत यासाठी ते अतिउच्च दर्जाचे बसविले गेले होते. अगदी पुंडलिक मंदिरा पासून ते अंबाबाई मंदिरा जवळील बंधाऱ्या पर्यंत आणि इकडे विष्णूपद मंदिरापर्यंतचे क्षेत्र हे कँमेरे कव्हर करु शकतात. त्यामुळे वाळंटातील वाळू चोरीला निश्चित आळा बसेल असे छातीठोकपणे तत्कालीन अधिकारी सांगत होते. मात्र वाळवंटातील सध्याची स्थिती पाहिली तर तेथील कँमेरे चालू आहेत की बंद असा सवाल निश्चितच उपस्थित होतो आहे.
















