टेंभुर्णी – टेंभुर्णी ते बेंबळे या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या दीड महिन्यापासून अर्धवट अवस्थेत असून संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी ठाम मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे माढा लोकसभा अध्यक्ष महेंद्र सोनवणे यांच्या वतीने करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित ठेकेदाराने केवळ मुरूम टाकून रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. त्यामुळे वाहनचालक, पादचारी तसेच रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये धूळ साचत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
सदर मार्गावरून शाळकरी मुले, आबालवृद्ध नागरिकांची सतत ये-जा असते. रस्त्यावर पसरलेल्या मुरमाच्या दगडांमुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. सध्या ऊसतोड हंगाम सुरू असल्याने उसाने भरलेले ट्रॅक्टर या रस्त्यावरून जात असून त्यामुळे खड्डे पडत आहेत व वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. याचा परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे एखादा गंभीर अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदारी कोण घेणार, असा सवाल उपस्थित करत बहुजन मुक्ती पार्टीने या बाबीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. सदर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात यावेत, अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या आशयाचे निवेदन प्रांत कार्यालयातील सरस्वती मुंडे यांना देण्यात आले. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे माढा लोकसभा अध्यक्ष महेंद्र सोनवणे, माढा लोकसभा प्रभारी प्रशांत गायकवाड, माणिक कीर्ती बागाव उपस्थित होते.




















