पंढरपूर – पंचायत समितीच्या सभापतीपदी परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे डाँ.शुभम सुरेश आगावणे तर उपसभापतीपदी वसंतराव देशमुखांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमोद देशमुख यांची निवड झाली. दरम्यान आजच्या निवडीमुळे गेल्या चाळीस वर्षापासून पंचायत समितीवर असलेल्या परिचारकांच्या सत्तेला यंदा सुरुंग लावण्याचे आमदार अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके यांनी पाहिलेले स्वप्न अखरे सत्यात न उतरता ते केवळ स्वप्नच राहिले.
पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्या प्रमाणे गुरुवारी (दि.१२ मार्च) पंचायत समितीच्या कार्यालयात येथील प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड प्रक्रिया पार पडली.
दरम्यान या निवडणूकीच्या निमित्ताने अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे पहावयास मिळाले. या निवडणूकीत परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने एकमेकांना साथ देत सभापती आणि उपसभापतीपदाची निवडणूक आपल्या बाजूने केली.
————————
राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रु नसतो
नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणूकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली घड्याळ या चिन्हावर पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनेक जागा लढविल्या गेलेल्या होत्या. तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते तथा विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगिरथ भालके हे अभिजीत पाटील यांच्या समवेत या निवडणूकीत सक्रीय सहभागी झालेले होते. त्यामुळे निवडणूक निकाला नंतर परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाला ८ तर आमदार अभिजीत पाटील व भालके यांना ८ जागांवर समाधान मानावे लागलेले होते. त्यामुळे पंचायत समितीची सत्तास्थापन करताना परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाला अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके यांची गरज भासेल असा तर्क तालुक्याच्या राजकीय वर्तुळात जाणकारांकडून वर्तविला जात होता. मात्र परिचारकांनी अखरेची खेळी करीत आपले जुने सहकारी ( मात्र मधल्या काळापासुन परिचारकांशी काहीसे अंतर ठेवून असलेले ) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्याशी संधान बांधले. त्यामुळे राजकारणात कोण कुणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कोण कुणाचा कायमचा मित्र नसतो हा प्रत्यय येथील निवडणूकीच्या निमित्ताने तालुक्याच्या जनतेला पहावयास मिळाला.
———————-
आमदार पाटील आणि भालकेंचे स्वप्न अपुरे
दरम्यान पंचायत समितीच्या निवडणूकी पासून गेल्या चाळीस वर्षापासून पंढरपूर तालुका पंचायत समितीवर एकहाती सत्ता असलेल्या परिचारक गटाला या वेळेस सत्तेपासून दूर ठेवायचे असा चंग आमदार अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके यांनी बांधला होता. मात्र राजकारणात मुरब्बी असलेल्या परिचारकांनी अखेरच्या क्षणी आपले जुने सहकारी वसंतराव देशमुख यांच्याशी बोलणी केली आणि अखरेच्या क्षणी ती यशस्वी देखील करुन दाखवुन विरोधकांचे पंचायत समितीच्या सत्तेपासून दूर ठेवण्याचे स्वप्न अक्षरश: धुळीस मिळविले.
—————————
परिचारक, गायकवाड यांनी लिलया पेलली जबाबदारी
परिचारक गटाकडून मध्यंतरीच्या काळात काहीसे दूरावलेले वसंतराव देशमुख यांच्या बरोबर चर्चा करण्याची जबाबदारी युटोपियन शुगर्सचे सर्वेसर्वा उमेश परिचारक आणि पंढरपूर तालुका कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड यांच्यावर सोपविली होती. या दोघांनीही ही जबाबदारी लिलया पेलत अखेर वसंतराव देशमुख यांचा पाठिंबा मिळविला.
———————
चौकट : ( आकड्यांचे गणित पालटले )
दरम्यान देशमुखांचा पाठिंबा मिळवित असताना वसंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कासेगाव पंचायत समितीच्या गणातून विजयी झालेले प्रमोद देशमुख यांना उपसभापतीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला. देशमुख यांच्या पाठिंब्यामुळे पंचायत समिती मधील आकड्याचे गणित जुळून आले. कारण पंचायत समितीच्या निवडणूकीत परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाला ८ जागा तर त्यांच्या विरोधात मैदानात उतरलेल्या आमदार अभिजीत पाटील आणि तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या भगिरथ भालके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वसंतराव देशमुख या सर्वांना मिळुन ८ जागा मिळाल्या होत्या. मात्र ऐनवेळी अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके या दोघांनाही वसंतराव देशमुख यांना आपल्या गटात खेचण्यात अपयश आले. हिच संधी साधत परिचारकांनी देशमुखांशी जुने मित्रत्वाचे नाते दृढ करीत पुन्हा एकदा एकत्रित येण्याच्या घातलेल्या सादेला अखरे यश येवुन परिचारक आणि देशमुख (भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष) एकत्र आल्यामुळे त्यांची सदस्य संख्या ९ वर पोहचली तर आमदार अभिजीत पाटील आणि भगिरथ भालके यांचे घोडे आठ संख्येवरच आडकून राहिले. आकड्यांचे गणित पालटल्याने परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाची पुन्हा एकदा पंचायत समितीवर सत्ता स्थापन झाली.
——————-
विरोधकांकडून सभापती,उपसभापतीपदासाठी दाखल केले अर्ज
आमदार अभिजीत पाटील यांच्या गटाकडून पंढरपूर पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी सावली अतुल गायकवाड यांनी तर उपसभापतीपदासाठी शहाजी मुळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
————————-
निवडी नंतर एकच जल्लोष
पंचायत समिती मधील आकड्यांचे गणित पालटल्यामुळे पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी परिचारकांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे डाँ.शुभम आगावणे यांची तर उपसभापतीपदी वसंतराव देशमुखांचे विश्वासू शिलेदार प्रमोद देशमुख यांची वर्णी लागली. सभापती, उपसभापतींच्या निवडीनंतर परिचारक आणि देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी पंचायत समितीच्या आवारात ढोल,ताशांच्या गजरात गुलालाची मुक्तपणे उधळण करीत फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.
———————
अखेर मित्रांच्या निधनानंतर देखील निभावली दोस्ती
स्व.सुरेशराव आगावणे यांनी आपल्या हयातीत संपूर्ण वेळ पक्ष पार्टीसाठी दिला होता. परिचारक कुटुंबावर नितांत प्रेम करत आपल्या श्वासाच्या शेवटपर्यंत त्यांनी परिचारक कुटुंबावरची निष्ठा जपली होती. दुर्दैवाने कोरोना कालावधी त्यांचे आकस्मित निधन झाले. कोरोना सारख्या कालावधीत प्रशांत परिचारक यांनी त्यांच्या प्रेत यात्रेला खांदा दिला होता. आगवणे कुटुंबीयांसोबत असलेलं संबंध सुरेशराव नंतर त्यांच्या पश्चात ही जपण्याचे काम प्रशांत परिचारकांनी केले आहे. कारण खर्डी पंचायत समिती गणातून (स्व.) सुरेशराव आगवणे यांचे पुत्र डाँ.शुभम आगवणे यांना उमेदवारी देण्यापासून ते पंचायत समिती सदस्यपदावर निवडून आणे पर्यंत सर्व जबाबदारी प्रशांत परिचारकांनी पार पडली. ऐवढ्यावरच ते थांबले नाहीत तर पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या सभापती पदावर डॉ.शुभम आगवणे यांना विराजमान करून आपले दोस्त स्वर्गीय सुरेशराव आगवणे यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिण्याचे काम प्रशांत मालकांनी केल्याची भावना पांडुरंग परिवारातील अनेक कार्यकर्त्यांनी आज बोलून दाखविली.
——————-
फोटोओळी : पंढरपूर पंचायत समितीवर आकड्यांचे गणित जुळवुन आणण्यासाठी युटोपियन शुगर्सचे सर्वेसर्वा उमेश परिचारक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिष गायकवाड यांनी वसंतराव देशमुख यांच्याशी चर्चा करुन त्यांचा पाठिंबा मिळविला.

























