अक्कलकोट – कार्तिक अमावास्याच्या मंगल पर्वावर शहरातील श्री शांतलिंगेश्वर हिरेमठासह श्री श्री नवसाचा मारुती मंदिर व हिंदू मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत शेख नुरुद्दीन बाबा दर्गाह समोर हजारो दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाले. श्री शांतलिंगेश्वर हिरेमठाचे शिष्य व भक्तगण यांच्या सहकार्याने आणि शहरवासीयांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी मठाधिपती श्री. ष . ब्. जय गुरू शांत लिंगराध्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हिरेमठातील श्री रेणुकाचार्य मूर्ती, माजी मठाधिपती लिंगैक्य श्री गुरुशांतलिंग महास्वामीजी व काशी विद्यापीठाचे माजी वरिष्ठ प्राध्यापक लिंगैक्य डॉ. श्री ष. ब्र. श्रीपती पंडिताराध्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून आकर्षक फुलांची सजावट आणि सुंदर रांगोळ्या साकारण्यात आल्या होत्या. पौरोहित वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी केले. तर महामंगलारती आझाद गल्ली महिला मंडळांनी केले.
या कार्यक्रमाला अडत व्यापारी चंद्रकांत स्वामी, भीमाशंकर करकी, कुंभार समाजाचे अध्यक्ष भीमाशंकर कुंभार, बाबुराव बिराजदार, इरण्णा पाटील, मठाचे व्यवस्थापक कल्लप्पा सोमेश्वर, शरणप्पा कुंभार, अशोक पाटील, शिवप्पा कुंभार, कुंभार समाज महिला मंडळ आदीसह शहरातील शेकडो भाविक उपस्थित होते. कुंभार गल्ली तरुण मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नियोजन केले.
हिंदू व मुस्लिम समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत शेख नुरुद्दीन बाबा दर्गाह समोर यावेळी पहिल्यांदाच कार्तिक अमावस्या निमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्याने परिसरातील भाविकांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, आकर्षक रांगोळी रेखाटून विविध सामाजिक संदेश रेखाटण्यात आले होते. दर्गाह परिसर कट्ट्यावर ठिकठिकाणी भक्तांच्या भाविकतेने उजळलेला दीपोत्सव पाहून संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
दर्गाह च्या गाभारा पासून परिसरातील प्रत्येक कोपऱ्याला दिव्यांची आरास सजवण्यात आली होती. विशेष म्हणजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर शहर व ग्रामीण भागातील भाविकांनी दर्गाहवर दिवे लावत परिसर उजळवला. शेकडो दिव्यांचे प्रतिबिंब फरशीवर पडून एक अद्भुत, नयनरम्य दृश्य तयार झाले. या दर्गाह स्थळी फुलांचा सजावट, दर्शन, नामस्मरण, आरती आणि गजरांनी वातावरण भारावून गेले होते. शेकडो दीपांच्या झगमगाटात दर्गाह च्या पार्श्वभूमीवर दर्गाह मध्ये सहभागी भाविकांनी बाबांचा जयघोष करत कार्तिक अमावस्या उत्सव साजरा केला.अध्यात्मिक तेजया निमित्ताने दर्गाह सेवा समितीच्या वतीने विशेष पूजन, आरती, तसेच सत्संगाचे आयोजन करण्यात आले. दर्गाह व परिसरात दिव्यांच्या मिणमिणत्या प्रकाशात सजलेल्या आरासीत दर्गाहचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.
सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या या दर्गाह वरील हा दीपोत्सव म्हणजे भक्तिभाव आणि अध्यात्म यांचा संगमच ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे संस्थापक महंमदपाशा पिरजादे, कार्याध्यक्ष कमलाकांत होटकर, विरुपाक्ष कुंभार, सादिक बागवान, राजशेकर कापसे, नंदकुमार जगदाळे, स्वामीराव वाकडे, संजय झिपरे, भगत भोसले,महादेव कांबळे, गुरुनाथ मोकाशी,बसवराज धनोरे,लक्ष्मीकांत कोळी,आकाश मुसळे,आपाशा मलवे आदींनी परिश्रम घेतले.
श्री नवसाचा मारुती मंदिरातसुद्धा कार्तिक अमावसा निमित्त दीपोत्सवाने उजळून निघाला होता. सदरचा मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून, श्री वटवृक्ष स्वामी देवस्थान लगत असल्याने जागृत मारुती मंदिर आहे. म्हणून याचे आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे देवस्थानचे पौराहीत्य करणारे गणेश गुमास्ते आहेत. या मंदिरात कार्तिक अमावसा साजरी करण्याचे परंपरा गेल्या अनेक वर्षांपासूनची आहे.
याठिकाणी शहरवासीयांसोबत परगावचे स्वामीभक्त मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यावेळी उंच आकाशात फाट्याक्याची आताषबाजी करण्यात आले. शेवटी तिन्ही ठिकाणी प्रसाद वाटप करण्यात आले.
दिपोत्सवाचे महत्त्व प्रकाशाचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. हा अंधार दूर करून जीवनात सकारात्मकता, आनंद आणि समृद्धी आणतो. हे सण मानवी नातेसंबंध दृढ करण्यास मदत करते आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करते. मनातील अज्ञान आणि अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आणणे हा दीपोत्सवामागील मुख्य हेतू आहे.जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतो आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.
– श्री. जयगुरूशांतलिंगराध्य महास्वामीजी


















