मुंबई – नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला दणदणीत यश देऊन मतदारांनी विकास, सेवा, सुशासनला कौल दिला आहे. 125 पेक्षा अधिक जागांवर भाजपाचा विजय आणि 1100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून दिले आहेत. भाजपावर मोठा विश्वास दाखविल्याबद्दल जनतेचे आभार मानतो असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी रविवारी केले.
भाजपा प्रदेश कार्यलयात फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. ढोलताशांचा गजर करत ,गुलाल उधळत, मिठाई वाटप करीत भाजपाचा विजय साजरा करण्यात आला. यावेळी आ. श्रीकांत भारतीय, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांच्यासह सचिव भरत राऊत, प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान आदी उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांवर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख कामकाजावर जनतेने व्यक्त केलेल्या विश्वासामुळे हा विजय सत्यात उतरला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, कार्यकारी अध्यक्ष नितीन नबिन, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष, सह संघटन मंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, अरुण सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय ताकदीने लढली. या विजयाचे सर्व श्रेय हे मंत्री, कार्यकर्ते, पदाधिकारी, बूथ कार्यकर्ते आणि अर्थातच मतदारांचे आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे एकमेव नेतृत्व राज्याला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे घेऊन जाण्यास समर्थ आहे. मराठवाडा ग्रीड मुळे अनेक ठिकाणी पाणी पोचले, विदर्भाचा अनुशेष भरून काढला जात आहे, कोकणाचा समृद्ध विकास होत आहे. अशा रितीने प्रत्येक विभागाचा विकास केला म्हणून जनतेने भाजपा महायुतीला कौल दिला असेही श्री. चव्हाण यांनी नमूद केले.
विरोधकांचा समाचार घेतते म्हणाले की, विरोधकांनी हीन टीका केली, फेक नरेटिव्ह पसरवले तरीही मतदारांनी भाजपावर विश्वास टाकला. उद्धव ठाकरे म्हणाले होते राज्याच्या जनतेला देण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही म्हणून उबाठा गटाची लायकी जनतेने ओळखत त्यांना काहीच दिले नाही, उबाठा गट दोन आकडी मजल देखील मारू शकला नाही. यापुढेही आगामी निवडणकांमध्ये जनता भूलथापांना बळी पडणार नाही आणि मुंबईकर तर नाहीच नाही. महायुतीसोबतच राहील असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रचंड मेहनत
नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका ह्या सामान्य कार्यकर्त्यांच्या असतात. या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी मेहनत घेतली. राज्यात 50 हून अधिक ठिकाणी सभा घेतल्या. ज्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते तेथे दूरध्वनीवरून,ऑनलाइन पद्धतीने मतदारांशी संपर्क साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत आणि राज्याचा केलेला विकास यामुळे हा विजय प्राप्त झाल्याचे चव्हाण म्हणाले.

























