जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी गाठल्याने नागरिकांचा घसा कोरडा पडत आहे. ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी रहिवाशांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. टँकरने पाणी पुरवठा करा, अशी मागणी सातत्याने होत असून, जिल्हा प्रशासनाद्वारे सध्या ७६३ ठिकाणी २५५ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.
गतवर्षी उन्हाळ्यात टंचाई निवारणासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला. वर्षभरात यामध्ये जराही खंड पडला नाही. नांदगाव, येवला तालुक्यांमधील काही वाड्या-वस्त्यांवर ३६५ दिवस टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येते आहे. उन्हाची तीव्रता आणि वातावरणातील दमटपणा पाण्याची मागणी वाढवित आहे. एप्रिलमध्येच कमाल तापमान चाळीशीपार गेल्याने पाण्याची मागणी वाढते आहे. ग्रामीण भागात स्थानिक पातळीवरील विहिरी, तळी, तलावांसारखा जलस्रोत आटू लागल्याने पिण्यासह वापरासाठी पाणी मिळविण्यासाठी महिला वर्गाला पायपीट करावी लागते आहे. रहिवाशांची पाण्यासाठीची वणवण थांबावी यासाठी ग्रामपंचायतींचे प्रस्ताव पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला प्राप्त होत आहेत.
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्तरावर या प्रस्तावांना मान्यता दिली जात असून, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्याबाबत नोंद केली जात आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. यामध्ये येवला, सिन्नर, सुरगाणा, नांदगाव, चांदवड, बागलाण, देवळा आणि इगतपुरी या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यांमधील लहान मोठी २३३ गावे आणि ५३० वाड्या अशा एकूण ७६३ ठिकाणी २५५ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. पाणीपुरवठ्याची भिस्त १२ खासगी आणि २४३ सरकारी टँकरवर आहे. २५५ टँकरच्या दिवसभरात ५३८ फेऱ्या होत आहेत. प्रत्येक टँकरच्या सरासरी दोन फेऱ्या होत आहेत.
नांदगावात ६४ टँकरच्या दीडशे फेऱ्या
नांदगाव तालुक्याला टंचाईच्या झळा सर्वाधिक बसत आहेत. ५८ गावे आणि २५५ वाड्या अशा ३१३ ठिकाणी ६४ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येते आहे. टँकरच्या सर्वाधिक १५१ फेऱ्या नांदगाव तालुक्यातच होत आहेत. त्याखालोखाल येवल्यात ५२ गावे आणि २५ वाड्या अशी ७७ ठिकाणे तहानलेली आहेत. तेथे ४५ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. मालेगावात ३६, बागलाणमध्ये ३२, चांदवड व दिंडोरीत प्रत्येकी २९ टँकर सुरू आहेत.
तालुकानिहाय टँकर स्थिती
तालुका गावे वाड्या टँकर
नांदगाव ५८ २५५ ६४
येवला ५२ २५ ४५