सोलापूर : शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कचरा संकलनासाठी जाणाऱ्या घंटागाड्या, स्वच्छता कर्मचारी व विभागीय अधिकारी यांनी परस्पर समन्वय ठेवून काम केल्यास नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही. प्रत्येक प्रभागात नियमित, वेळेत व प्रभावी कचरा संकलन होणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार प्रलंबित राहता कामा नये, असे आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आज महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत सोलापूर शहरातील स्वच्छतेसंदर्भात मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांची आढावा बैठक पार पडली.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, माजी महापौर श्रीकंचना यन्नम,नगरसेविका राजेश्री दोडमणी,नगरसेविका भरत सिंग बडूरवाले, नगरसेवक अजय पोनम,सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, सफाई अधीक्षक अनिल चराटे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान घनकचरा विभागाचे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी विभागाच्या आस्थापना विषयक बाबींसह कचरा संकलन यंत्रणा, यांत्रिक रोड स्वीपिंग मशीन, प्रेशरयुक्त पाण्याने स्वच्छता करणारी यंत्रणा, कचरा ट्रान्सफर स्टेशन, सार्वजनिक स्वच्छालयांची स्वच्छता व दुरुस्ती, घंटागाडी व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती दिली.
रस्त्यावरील आजोरा दाट झोपडपट्टी परिसरात कचरा संकलनासाठी “स्वच्छता दीदी” यांची नेमणूक करण्यात आलेली असून झोपडपट्टी भागातील नियमित कचरा संकलन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक स्वच्छतेच्या ठिकाणी आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात आल्या असून काही भागांत बोरवेल पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. महापौर विनायक कोंड्याल यांनी स्वच्छता व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
शहरातील सर्व सार्वजनिक स्वच्छालये, झोपडपट्टी भागातील स्वच्छता आणि यांत्रिक साफसफाई यावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.बैठकीत शहरातील स्वच्छता व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबविण्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सूचना दिल्या.
नागरिकांनी नागरी समस्या अॅपवर नोंदवाव्यात : आयुक्त डॉ. ओम्बासे
यावेळी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदवण्यासाठी ऑनलाईन तक्रार नोंदणी अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असल्याची माहिती दिली. नागरिकांनी स्वच्छतेसंदर्भातील तसेच इतर नागरी समस्या या अॅपच्या माध्यमातून नोंदवाव्यात, जेणेकरून त्यावर तात्काळ कार्यवाही करता येईल, असे आवाहन त्यांनी केले.

























