पंढरपू – येथील शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंढरीची वारी रायगडच्या द्वारी अशी घोषवाक्ये देवून रायगडवर शिवछत्रपतींच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन रायगड मोहिम फत्तेकरीत नुकतीच पंढरीनगरी मध्ये दाखल झाली. विशेष म्हणजे यावर्षी विक्रमी संख्येने अर्थात तब्बल साडेपाचशेहून अधिक महिला आणि पुरुष या मोहिमेत सहभागी झाले होते अशी माहिती येथील शिवभक्त प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्रीराम गणपुले यांनी दिली.
या मोहिमे संदर्भात माहिती देताना श्रीराम गणपुले व सुधीर घोडके यांनी सांगितले की, तिथीनुसार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त नतमस्तक होण्यासाठी पंढरपुरातून शिवभक्त प्रतिष्ठानची दुर्ग मोहीम प्रतिवर्षी रायगडला जाते. यंदाच्या वर्षी तब्बल ५७० तरुण स्त्री-पुरुष हे रायगड साठी पंढरपुरातून रवाना झाले होते.
विशेष म्हणजे रायगडावर गेल्यावर त्या ठिकाणी गडपूजन, व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली. सर्वात विशेष म्हणजे एक दिवस गडस्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले. होळीच्या माळावरच्या शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे पुजन करुन जगदिश्वराची आणि शिवसमाधीचे पूजन करुन देखील सर्व शिवभक्तांनी केले. शिवछत्रपतींचे आर्शीर्वाद घेऊन सर्व शिवभक्त पंढरपूर मध्ये नुकतेच दाखल झाल्याची माहिती देखील श्रीराम गणपुले यांनी दिली.
——————-
११ बसगाड्या आणि ३ जीप मधून शिवभक्त झाले होते रवाना
यंदाच्या वर्षी येथून ११ बसगाड्या आणि तीन जीप गाड्यातून सुमारे ५३० शिवभक्त रायगड मोहिमेवर गेलेले होते. विशेष म्हणजे या मध्ये १७० मुली आणि महिला आणि सुमारे ४०० च्या आसपास पुरुष आणि मुले सहभागी झालेल्या होत्या. रायगडावर सर्व धारकरी, वारकरी दिंडीसह शिवसमाधीवर नतमस्तक होवून धन्य झाले.
———————–
पंचवीस वर्षाची परंपरा
रायगडभूषण पुरस्कार प्राप्त येथील शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूरच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शिवसमाधी नतमस्तक दुर्गमोहिम रायगड राबविण्यात आली. या मोहिमे मध्ये पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विक्रमी संख्येने शिवभक्त सहभागी झालेले होते. ही परंपरा जवळजवळ २५ वर्षापासून अखंडितपणे सुरु आहे. पंढरीची वारी रायगडच्या व्दारी या उपक्रमाव्दारे दरवर्षी ही मोहिम राबविली जात असते.
———————–
महाराजांचे विचार गडकिल्यांना भेटी देवून आत्मसात केले पाहिजेत
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर बळकट करावयाचे असतील तर प्रत्यक्ष गडकिल्यांवर जावुन गड किल्यांना भेटी देवून त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेत. हीच भावना मना मध्ये ठेवून आम्ही ही शिवसमाधी नतमस्तक दुर्गमोहिम राबवित असल्याची माहिती श्रीराम गणपुले, सुधीर घोडके आदींनी शिवभक्तांनी दिली.

























