वसमत / हिंगोली – वसमत बसस्थानकावरील “हिरकणी कक्ष” प्रकरणात पोलिस आणि एसटी महामंडळाचे अधिकारी आता ‘एकमेकांचे रक्षण’ करण्यात व्यस्त आहेत, असा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. दोन वर्षांपासून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न डावलला गेला, तरीही कारवाई न होणे हे पोलिसांच्या निष्क्रियतेचे आणि अधिकाऱ्यांच्या भीतीचे ठळक उदाहरण असल्याचे मत व्यक्त होत आहे.
दोन वर्षांपासून बसस्थानकावर प्रत्यक्ष कक्ष नसताना, गुत्तेदाराने कुलूपबंद पत्र्याच्या शेड मधील दरवाज्यावर कागद चिकटवून “हिरकणी कक्ष सुरू” असा बनाव रचला. ही दिशाभूल महिलांच्या सुरक्षेचा थेट भंग असूनही पोलिसांनी ‘चौकशी सुरू आहे’ म्हणत विषय थंड बसवला. नागरिकांचा प्रश्न आहे.
“सत्य पुराव्यासह तक्रार असताना चौकशीची एवढी लांबणी का? गुत्तेदारावर कारवाई टाळून कोणाला वाचवले जात आहे?”शहरातील जनतेचे मत स्पष्ट आहे एसटी अधिकाऱ्यांना गोत्यात येऊ नये म्हणून पोलिसांनी हेतुपुरस्सर गुत्तेदारावर कारवाई टाळली. पण कायद्याने प्रथमदर्शी दोषी म्हणजे कामकाज करणारा म्हणजे गुत्तेदारच!
महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाने बसस्थानकांवर “हिरकणी कक्ष” बंधनकारक केले असताना, येथे फक्त फलक लावून कर्तव्य निभावल्याचा देखावा दाखवण्यात आला. अशा बनावट उपक्रमाला पोलिसांनी गप्प राहून मान्यता दिल्यासारखे वाटत असल्याने शहरात संताप उसळला आहे.महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा चौकशीचा नव्हे, तर तात्काळ गुन्हा नोंदवण्याचा आहे,”असे नागरिकांचे ठाम मत आहे.पोलिस विभागाने जर या प्रकरणात तत्काळ गुत्तेदाराविरुद्ध गुन्हा नोंदवून संबंधित एसटी अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवली नाही, तर नागरिकांनी उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून राज्यस्तरीय चौकशीची मागणी करण्याचा इशारा दिला आहे.
दोन वर्षांपासून हिरकणी कक्ष फक्त कागदावर. गुत्तेदाराने खोटा अहवाल देऊन शासनाची दिशाभूल केली. पोलिस “चौकशी सुरू” या बहाण्याने कारवाई टाळत आहेत. अधिकारी वाचवण्यासाठी गुत्तेदारावर कारवाई थांबवली जात असल्याचा संशय. नागरिकांचा इशारा – आता गुन्हा नोंदवा, अन्यथा राज्यस्तरीय चौकशी मागवली जाईल.

















