टेंभुर्णी – नागरिकांचे गहाळ मोबाईल शोधून देण्यात टेंभुर्णी पोलीस ठाण्याने आदर्शवत कामगिरी केली आहे. तब्बल 11 लाख 25 हजार रुपये किमतीचे 45 मोबाईल फोन शोधून काढत संबंधित तक्रारदारांच्या हाती सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते देण्यात आले
दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी श्री. कुलकर्णी यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे वार्षिक निरीक्षण साठी भेट दिली. त्यावेळी आयोजित विशेष कार्यक्रमात गहाळ मोबाईल मालकांना परत देण्यात आले. मोबाईल मिळालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पसरले होते. नागरिकांचे मोबाईल गहाळ झाल्यानंतर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या जातात.
या तक्रारींचा तांत्रिक तपास करून गहाळ मोबाईल शोधण्यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. नारायण पवार यांनी PC/155 जगदाळे यांच्या प्रमुखत्वाखाली एक विशेष पथक स्थापन केले.
या पथकाने सायबर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांच्या मदतीने सखोल तपास करून या मोहिमेत आतापर्यंत 45 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्या एकत्रित किंमती 11,25,000 इतकी आहे.
1)शुभम यशवंत पाटील (रा. बावी, ता. माढा)
2)अमर रामलिंग सातव (रा. चोभेपिंपरी, ता. माढा)
3)विठ्ठल गायकवाड (रा. टेंभुर्णी)
4)तानाजी कृष्णा पवार (रा. टेंभुर्णी)
5)विजया शंभू शिंदे (रा. टेंभुर्णी)
6) शहाबाद खलील शेख (रा. टेंभुर्णी)
7) भारत माणिक गोफणे (रा. टाकळी)
8) अमृता भीमराव गायकवाड (रा. चांदज)
… तसेच आणखी 37 नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाले.
या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा अंजना कृष्णा व्ही.एस., पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, कुलदीप सोनटक्के, प्रशांत मदने, पुरुषोत्तम धापटे, स्वाती सुरवसे तसेच सर्व पोलीस अंमलदार उपस्थित होते.
या उपक्रमाबद्दल बोलताना टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हणाले, की “पोलीस फक्त गुन्हे उकलण्यासाठीच नाही, तर नागरिकांना दिलासा देण्यासाठीही काम करतात. गहाळ मोबाईल शोध मोहीम ही जनतेच्या सेवेसाठी आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना गती दिली जाईल.”
मोबाईल परत मिळाल्यानंतर नागरिकांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे मनःपूर्वक आभार मानले.
“हरवलेला मोबाईल मिळेल याची आशा नव्हती, पण पोलिसांनी प्रयत्नपूर्वक शोध लावला.
टेंभुर्णी पोलिसांचे काम मनाला भिडणारे आहे,” असे तक्रारदार शुभम पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
टेंभुर्णी पोलीस ठाण्याची ही कामगिरी केवळ गहाळ मोबाईल शोधण्यापुरती मर्यादित नसून ती “जनतेचा पोलीसांवरील विश्वास दृढ करणारे उदाहरण” ठरली आहे.
तंत्रज्ञानाचा योग्य वापर, वेळेवर प्रतिसाद आणि संवेदनशील दृष्टीकोन —
हीच यशाची गुरुकिल्ली ठरली असल्याचे चित्र या मोहिमेतून स्पष्ट दिसत असून या टेंभुर्णी पोलीसांनी केलेल्या कामगिरीबद्दल सर्वसामान्य जनतेतून कौतुक होत आहे
















