सोलापूर – जिल्ह्यातील ग्रामीण भागातील घरकुल बांधणीस गती देण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात येत आहेत. प्रधानमंत्री घरकुल योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, आतापर्यंत ६५३ लाभार्थ्यांना तब्बल १८०० ब्रास वाळूचे मोफत वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.
दरम्यान, या योजनेमुळे ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबांना स्वतःचे घर उभारण्यासाठी शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मोफत वाळू वितरणाच्या या उपक्रमामुळे घरकुल बांधणीला वेग आला असून, ‘घरकुलाचे स्वप्न’ साकार होण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे. घरकुल बांधणी करताना वाळूचा खर्च हा ग्रामीण कुटुंबांसाठी मोठा आर्थिक बोजा ठरतो. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने मोफत वाळू वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे अनेक कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होण्यास मोठी मदत होत आहे.
एकीकडे प्रधानमंत्री आवास योजना सुरळीत असताना दुसरीकडे रमाई आवास योजना तसेच जल जीवन मिशन बंद पडण्याच्या मार्गावर आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, या संदर्भात देखील शासन स्तरावर कामकाज सुरू आहे. लवकरच योजना कार्यान्वित केल्या जातील असेही जंगम यांनी सांगितले.
चौकट
ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष तपासणी
जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. घरकुलाचे काम प्रत्यक्ष सुरू असल्याची खात्री करूनच वाळूचे वाटप करण्यात येते. यामुळे अपात्र लाभार्थ्यांकडे वाळू वळवली जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे.
तपासणीदरम्यान बांधकामाची प्रगती, आवश्यक साहित्य, लाभार्थ्यांची स्थिती आदी बाबींचा टप्प्याटप्प्याने सविस्तर आढावा घेतला जातो. प्रशासनाचा हा काटेकोर दृष्टिकोन
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीस हातभार लावत आहे.
चौकट
मोफत वाळू वितरणासाठी आठवड्यातून दोन दिवस नियोजन
मोफत वाळू वितरणासाठी आठवड्यातील मंगळवार आणि शुक्रवार हे दोन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. त्या दिवशी संबंधित लाभार्थ्यांना नियोजनपूर्वक वाळू पुरवठा केला जातो. वितरण प्रक्रियेत कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासन, महसूल विभाग आणि ग्रामपंचायत स्तरावर समन्वय साधला जात आहे. ज्या लाभार्थ्यांना वाळू वितरण करावयाची आहे त्यांना यापूर्वीच वाळू देण्यासंबंधीचे सूचना दिल्या जातात. त्यानुसार त्यांची यादी तयार करून लाभार्थ्यांची सर्व कागदपत्रे एकत्रित करून त्यांच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जातो. ओटीपी तपासणी झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्याच्या नावाने पाच ब्रास पैकी दोन ब्रास व त्यानंतर तीन ब्रास अशाटप्प्याटप्प्याने प्रत्येक लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळूचे मोफत वितरण केले जात आहे. वाळू वितरण तसेच वाळूचा गैर प्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाने या प्रकारे वाळू वितरण व्यवस्था सुरू ठेवली असून त्यानुसार आत्तापर्यंत ६५३ लाभार्थ्यांना १८०० ब्रास वाळू वितरण झाले असून, त्या पद्धतीने घरकुलाचे कामकाज सुरू असल्याचेही जंगम यांनी सांगितले.
कोट
घरकुल योजनांना चालना
प्रधानमंत्री आवास योजना व राज्य शासनाच्या विविध घरकुल योजनांतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर घरे बांधली जात आहेत. मात्र बांधकाम साहित्याच्या वाढत्या दरामुळे अनेक लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. मोफत वाळू वितरणामुळे या अडचणी काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले की, पात्र लाभार्थ्यांना वेळेत वाळू उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे. घरकुलाचे काम रखडू नये, यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात आहे. पुढील काळातही ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असून, जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील.






















