मंगळवेढा – “पक्षी वाचवाल तरच निसर्ग वाचेल” हा उदात्त संदेश देत, पाटकळ येथे गेल्या २० वर्षांची परंपरा जपत यावर्षीही पक्षांच्या पाणपोईचे भव्य उद्घाटन करण्यात आले.
भीमराव मोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा उपक्रम दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीला राबवला जातो. यावर्षी ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून हा सोहळा संपन्न झाला.
सायकल मोहिमेद्वारे जनजागृती
मंगळवेढ्यातील ‘वारी परिवार’ समूहाने पक्षी आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मंगळवेढा ते जत अशा २० गावांमध्ये १०० किलोमीटरचा सायकल प्रवास केला.
ही मोहीम पूर्ण करून वारी परिवाराचे सदस्य पाटकळ येथील मोरे फार्महाऊसवर पोहोचले असता, तेथील सुवासिनींनी आरती ओवाळून त्यांचे जंगी स्वागत केले.
प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटन
पक्षांच्या या पाणपोईचे उद्घाटन पंचायत समितीच्या नूतन सदस्या सौ.दिपाली आनंद ताड यांच्या शुभहस्ते आणि बाळकृष्ण महाराज बठाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी पाटकळ गावातील ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांना आवाहन
वारी परिवाराच्या सदस्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना एक भावनिक आवाहन केले. त्यांनी सांगितले की, ”वाढत्या उन्हाळ्यात मुक्या पाखरांची तहान भागवणे हे आपले कर्तव्य आहे.
प्रत्येकाने आपल्या घरासमोर किमान एक पाण्याचे भांडे आणि मूठभर धान्य ठेवावे.
आपण पक्षी वाचवले तरच आपला निसर्ग सुरक्षित राहील.” २० वर्षांपासून सुरू असलेला भीमराव मोरे यांचा हा उपक्रम आज एक लोकचळवळ बनत असून, पर्यावरण प्रेमींकडून याचे मोठे कौतुक होत आहे.

























