सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय महायुती करणे व न करणे याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. महायुती न झाल्यास भाजप ‘एकला चलो रे…’ची भूमिका घेणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे तीनही आमदार व शहराध्यक्ष सक्षम असून या निवडणुकीसाठी बाहेरच्या नेतृत्वाची पक्षाला आवश्यकता नाही. सर्व शस्त्रे घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. महापालिका निवडणुकीत अबकी बार 75 पार असा नारा देत यंदाही महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, असा विश्वास असे पालकमंत्री गोरे यांनी सोमवारी सोलापुरात पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
महापालिकेच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजपच्या सत्ता काळात सोलापूर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. बहुतांश प्रश्न सुटले आहेत. त्यामुळे भाजपचा जनाधार वाढत आहे. महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडे सुमारे बाराशे जणांची अर्ज आले आहेत. ही भाजपवरील जनतेच्या विश्वासाची प्रचिती आहे. भाजप वगळता अन्य पक्षांना महापालिका निवडणुकीसाठी 102 उमेदवार मिळणे अवघड आहे. या पक्षांची स्थिती गंभीर आहे. शहरातील भाजपच्या तिन्ही आमदारांचे चांगले काम आहेत. हे तीनही आमदार सक्षम असून त्यांच्या व शहराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सोलापूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आम्ही नवीन संकल्प घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. या निवडणुकीत भाजपला 75 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास आहे.
महापालिका निवडणुकीसाठी सर्वसंमतीने उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री गोरे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.
शहरातील दोन उड्डाणपूलांचे काम भूसंपादनाअभावी रखडले आहे. बाधित होणाऱ्या मिळकतींच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या प्रकल्पाचे काम सुरू करण्यात येणार आहे. पार्क स्टेडियमच्यासंदर्भात कुठलाही घोटाळा झाला नाही. भाडे करारासंदर्भातील मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित आहे. ते भरले जाईल, असेही पालकमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर खुलासा करताना सांगितले.
या पत्रकार परिषदेला आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आदी उपस्थित होते.
पाणीपुरवठ्याबाबत टेंडरची प्रक्रिया अवघ्या सहा दिवसात
समांतर जलवाहिनी योजना पूर्ण झाल्यानंतर आता शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी अंतर्गत वितरण व्यवस्था सुधारावी लागणार आहे. यासाठी शासनाने 892 कोटींचा प्रकल्प मंजूर केला, मात्र त्याचे टेंडर महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी काढावे, यासाठी मी भाजपचे सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला. मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केले. टेंडर प्रक्रियेला सहा महिने लागणार होते, पण ते काम अवघ्या सहा दिवसात पूर्ण करून निवडणूक लागण्यापूर्वी टेंडर काढले, असे पालकमंत्री म्हणाले.



























