पंढरपूर – सध्या दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. येथील चंद्रभागेच्या वाळंवटा मध्ये उन्हामुळे भाविकांच्या पायांना चटके बसत आहेत. उन्हाळ्यात भाविकांच्या पायाला चटक्यांचा त्रास होणार नाही अशी कोणतीही व्यवस्था प्रशासनाच्या वतीने सध्या वाळवंटा मध्ये उपलब्ध नाही. चैत्री यात्रा देखील जवळ आलेली आहे. यात्रे मध्ये भाविकांची वाळवंटात मांदियाळी असते. रणरणत्या उन्हाचा भाविकांना कमालीचा त्रास होत असतो. त्यामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात जुना दगडी पुल ते चंद्रभागा घाट या दरम्यान प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरुपात व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी भाविकांमधून जोर धरीत आहे.
पंढरपूर हे राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्र आहे. अध्यात्मिक राजधानी म्हणून देखील या पंढरीचा महिमा सर्वदूर वर्णिला जातो. त्यामुळेच वर्षभरातील चार यात्रांशिवाय ऐरव्हीच्या एकादशीला देखील भाविकांची येथे मोठी मांदियाळी असते. यामध्येच लागून सुट्या आल्या नंतर कुटुंबियांसह अनेक भाविक दर्शनासाठी येथे दाखल होत असतात. चंद्रभागेचे स्नान, विठुरायाचे दर्शन आणि नगरप्रदक्षिणा या गोष्टींना वारकरी संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.
दरम्यान सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झालेले आहेत. यामध्येच सुर्य देखील दिवसेंदिवस कमालीची आग ओकताना दिसत आहे. दुपारच्या वेळी चंद्रभागेच्या वाळवंटा मधील वाळू एखाद्या आगीच्या निखाऱ्या प्रमाणे तापत आहे. या मध्येच परगावाहून आलेले भाविक अगदी जुन्या दगडी पुला जवळ उतरुन मोठ्या श्रध्देने वाळवंटा मध्ये अनवाणी पायाने चालत चंद्रभागा स्नान तसेच पुंडलिक दर्शनासाठी दाखल होत असतात. काही जण तर भर उन्हात दुपारी देखील नगरप्रदक्षिणा करीत असतात. त्यामुळे भाविकांना उन्हाचा मोठा त्रास होतो. मात्र प्रशासनाच्या वतीने भाविकांना निवारा उपलब्ध व्हावा यासाठी वाळवंटा मध्ये कोणतीही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही.
—————————–
मालकी ऐकाची आणि जबाबदारी दुसऱ्याची
कारण चंद्रभागेच्या पाण्यावर पाटबंधारे विभागाची मालकी आहे. पात्रातील वाळूवर महसूलची आणि वाळवंटाच्या स्वच्छतेची जबाबदारी पालिकेवर आणि मंदिर समिती प्रशासनावर टाकलेली आहे. त्यामुळे भाविकांना वाळवंटा मध्ये सोयीसुविधा देण्याची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न निर्माण होत आहे.
———————————-
शासकीय विभागात समन्वयाची गरज
सोयीसुविधा पुरविण्यावरुन महसुल, पाटबंधारे आणि पालिका तसेच मंदिर समिती प्रशासन या विभागाच्या वादा मध्ये भाविकांचे चंद्रभागा वाळवंटा मध्ये विविध समस्यांनी सध्या भाविकांचे प्रचंड हाल होत आहेत. वाळवंटात जुन्या दगडी पुला पासून ते पुंडलिक मंदिर पर्यंत साधारणपणे एक ते दीड किलोमीटर ऐवढे अंतर आहे. कडक उन्हा मध्ये देखील भाविक अनवाणी पायाने हे अंतर पार करीत असतात. त्यामुळे पाटबंधारे, महसूल, पालिका आणि मंदिर प्रशासन या विभागांनी एकमेकांमध्ये समन्वय साधुन ऐवढ्या अंतरापुरती भाविकांसाठी सावलीची व्यवस्था करावी अशी मागणी सध्या जोर धरीत आहे.
—————————-
तात्पुरत्या या उपाय योजना आहेत शक्य
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यात्रांच्या काळात पदस्पर्श दर्शन रांगेवर ज्या प्रमाणे प्लास्टिक पेपर अथवा पत्रे टाकते तशी वाळवंटात घाटाच्या बाजूला व्यवस्था करणे शक्य आहे. या बरोबरच विठ्ठल मंदिराच्या महाव्दार आणि पश्चिमव्दारा मध्ये स्थानिक व्यापारी ज्या प्रमाणे शेडनेटचा मांडव उभा करतात तशा पध्दतीने देखील वाळवंटा मध्ये तात्पुरत्या स्वरुपात मांडवाची व्यवस्था केल्या भाविकांना उन्हा पासून त्रास होणार नाही. कायमस्वरुपी देखील घाटाच्या बाजूला रस्ता करुन त्यावर पत्र्यांचे अच्छादन करुन जमीनीवर उष्णतारोधक पांढऱ्या रंगाचा विशिष्ट आँईलपेंट देखी लावता येवू शकतो. या प्रकारच्या व्यवस्थेचा खर्च विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून देखील करता येवू शकतो.
———————–
चैत्री यात्रेत भाविकांची वाळवंटात असते मांदियाळी
चैत्री यात्रा ही पळती यात्रा असते असे म्हटले जाते. कारण या यात्रे मध्ये अनेक भाविक हे कावडीसह येथे विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. कावडींना चंद्रभागा स्नान घालून हे भाविक नगरप्रदक्षिणा, विठ्ठलरुक्मिणीचे दर्शन करुन पुढे शिंगणापूराकडे जात असतात. त्यामुळे कावडी घेऊन येणाऱ्या भाविकांची चैत्री यात्रेच्या काळात वाळवंटात मोठी गर्दी असते. त्यामुळे चैत्राच्या उन्हात या भाविकांचे वाळवंटात कमालीचे हाल होत असतात.
———————————
चंद्रभागेच्या वाळवंटा मध्ये स्नानासाठी आलेलो आहे.वाळवंटा मध्ये उन्हामुळे अक्षरश: पायाला चकटे बसतात.प्रशासनाने काही तरी व्यवस्था करणं गरजेचं आहे.
गजानन आसबे ( भाविक )
—————————
























