राज्यात आज, रविवारी ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. जवळपास २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदे तर, सरपंचांच्या १३० रिक्त पदांसाठी या निवडणुका होणार आहेत. राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण लक्षात घेता या निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शिवसेनेत पडलेली फूट व माविआ सरकारचे पायउतार होणे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट या पार्श्वभूमीवर राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच मतदारांचा कल यातून समोर येणार आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षाचे चिन्ह नसल्याने निकालांनंतर सगळेच पक्ष आपणच पुढे असल्याचा दावा करतात. मात्र पक्षांतर्गत मात्र मतदार नक्की कोणत्या बाजूने आहे याची स्पष्टता या निमित्ताने होत असते. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्यातील विविध मतदान केंद्रांवर आज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. याची मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तेथे ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हांवर होत नसली तरी प्रत्येक ठिकाणी विविध राजकीय पक्षांचे नेते निवडणुकीचे सूत्रधार आहेत. महायुतीतील तीन पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात दंड थोपटून असल्याचे तसेच, महाविकास आघाडीतील पक्षांचे कार्यकर्ते देखील एकमेकांच्या विरोधात निवडणुकीत उतरल्याचे चित्र आहे.